Thursday, June 9, 2022

हिरवी पाती 6

 १} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.📚✒️

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  6

४} पुस्तकाचे नाव      :-  हिरवी पती

५ } कवी  :- रवींद्रकुमार लटींगे

६} प्रकाशक  :- ग्राममित्र प्रकाशन कराड

७} प्रकाशन वर्ष  :- 2021 

८} एकूण पृष्ठ संख्या :-  72

९} वाड् मय प्रकार :- कवितासंग्रह

१० } मूल्य   :- ₹ 111 फक्त


वाऱ्यावर डुलणारी

उनाड हिरवी पाती 

निसर्ग मानवाचे 

सांगती अतूट नाती


.निसर्गाच्या छायेत आपण सतत रहात असतो.निसर्गाचे आणि आपले नाते अतूट आहे.निसर्गाच्या नाशाला सुरुवात झाली की, आपल्याही नाशाला सुरुवात होते. भिंतीवरचा रंग पुसला जातो. मनावर उमटलेला निसर्गाचा गर्द हिरवा रंग कधीच पुसला जात नाही. उलट वय वाढत जातं तसा तसा हा रंग अधिकच गडद होत जातो.


 अनेक शब्द आपल्या विस्मरणात जातात. पण हिरवा बोलीचा शब्द ओठावर आला की मनासमोर हिरवे गर्द रान दिसते. पाऊस पडत असताना आपण आपल्यालाच विसरत जातो. संध्याकाळी दिवेलागण मनाला हुरहुर लावून जाते. निसर्ग आपल्या तनामनात रुंजी घालत असतो. असाच सुंदर हिरवा निसर्ग आपल्या काव्यातून रवींद्रकुमार  यांनी रेखाटलेल्या आहे .


प्रत्येक पानापानावर जणूकाही ही झाडे शब्दांच्या रूपाने बोलकी होऊन आपल्याशी बोलत आहेत आणि एक अनोखा संवाद  आपल्याशी करत आहेत असा भास झाल्याशिवाय राहत नाही.


वार्‍याच्या स्पर्शाने मोहरायायचं 

पावसात सखे चिंब भिजायचं निसर्गाशी भ्रमंतीच नातं जपायचं 

जीवनात पाण्यावाणी प्रवाहित राहायचं


या पाझर तलाव आपल्या कवितेतून  सरांनी अतिशय सुंदर निसर्ग आणि जीवन यांचं नातं रेखाटलेले आहे. पावसात चिंब भिजायचं चिंब भिजताना सोबत मात्र सखी  आणि मग सखी सोबत आपलं जीवन या पाण्यासारख प्रवाहित करायचं .एवढा समर्पक अर्थ आपल्या काव्यपंक्तीतून या ठिकाणी त्यांनी रेखाटला आहे निसर्गप्रेमींना आकर्षित करना सातारा जिल्ह्यातील फुलांनी बहरलेला कास पुष्प पठार त्यांनी आपल्या काव्यातून रेखाटलेला आहे ते म्हणतात .


कातळ फुलोत्सवाची 

नजाकत भारी 

रूप दिसती 

देखणं पठारावरी 


असं देखणं रुप कास पठाराचे त्यांनी आपल्या काव्यातून रेखाटलेले आहे म्हणजे एका कवीला झाडात कविता दिसते, फुलात कविता दिसते, मातीत कविता दिसते कारण कविता ही त्याच्या सुरुवातीला हृदयात असते. असाच हा बहुताली बहरणारा निसर्ग सरांच्या हृदयातही बहरलेला आहे त्यामुळे त्यांनी बहरलेल्या फुलांचा कुंचला करून आपल्या निसर्ग लेखणीतून सारा नजारा शब्दबद्ध करून आम्हा रसिक आणि वाचक प्रेमींसाठी आपल्या पुस्तकरूपी ठेव्यातून बहाल केला आहे .

धुक्यात हरवली वाट 

ती शोधायला लागलो 

पुढं पुढं शोधता वाट 

मीच धुक्यात हरवलो 


आदरणीय सरांचं असं निसर्गात हरवून जाणं आपल्याला या काव्यसंग्रहात पानोपानी दिसतं आणि आपणही त्या शब्द धुक्यासंगे कधी हरवून जातो हे कळतच नाही .


  हिरवी पाती मधील कविता निसर्गाचे वेगवेगळे रूप आपल्याला दाखवतात. शांत वाहणारी नदी मात्र अतिवृष्टी मध्ये रौद्र रूप धारण करते आणि क्षणात सारं काही उद्ध्वस्त करते ही दोन्ही रूपं त्यांनी अतिशय समर्पक रीतीने आपल्या काव्यातून रेखाटली आहेत खरंतर ही त्यांच्या लेखणीची एक वैशिष्ट्यपूर्ण धाटणी आहे. त्यांच्या लेखणीला साक्षात निसर्गाचं वरदान लाभलेल आहे .अशीही हिरवीगार पाती सतत प्रफुल्लित आणि बहरत राहोत याच माझ्या शब्दफुलांच्या शुभेच्छा🌹🌷🌿🌴


शब्दांकन

सौ .अंजली शशिकांत गोडसे

            मर्ढे सातारा



No comments:

Post a Comment