Wednesday, May 31, 2023

मी अशी घडले

 








मी अशी घडले

दिवस हे पाखरांसारखे असतात. भूर्रकन उडून जातात. आणि उरतात फक्त पिस, आठवणीची काही काळी, काही पांढरी, काही रंगीत, काही मऊ, काही खरबरीत खरं तर ही प्रिसव जपून ठेवायची असतात आणि ती गुंफून तयार करायची असते चटई आयुष्याच्या संध्याकाळी निवांत बनण्यासाठी अशाच माझ्या जीवनातल्या माता घडवणान्या कडू गोड आठवणी, आशा निराशेचे क्षण मी  शब्दरूपाने साकारत आहे. माझे शब्द  आलंकारिक किंवा जड नाहीत. मनाच्या पडद्यावर जे उमटले तेच रेखाटन गेले. खेड्यातल्या प्रत्येक सामान्य मुलीच जे भावविश्व आणि जगण असत तेच माझंही होतं. त्यात असामान्य आणि जगावेगळ अस काहीच नाही. सहयाद्रीच्या कुशीत आणि दक्षिण काशी म्हणून

समजलं जाणाऱ्या वाई तालुक्यातील कृष्णा नदिच्या मुशीत वसलेल पसरणी' हे माझं गावं येथे भल्या पहाटे भैरवनाथाच्या आरतीसाठी वाजणाऱ्या ढोलाच्या आवाजाने जाग येते. 

 शिर्के घराण्यात माझा जन्म३१जुलै१९८२साली झाला. 

माझ्या जन्माच्या अगोदर माझ्या पणजोबांनी वाघ मारल्याची आख्यायिका ऐकायला मिळायची. आजोबा वारकरी पंथातील असल्यामुळे घरातील वातावरण सकाळपासूनच विठ्ठलमय होऊन जायचं. रोजचं ऐकून ऐकून हरीपाठ, पसायदान तोंडपाठ झालेलं होत. माझ्या आजीचे नाव 'मंजूबाई, आजोबांचे नाव 'गणपत, वडिलांचे नाव प्रभाकर आणि माझ्या आईचे नाव 'चंद्रभागा 'होते घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे माझे वडील कामा- करीता बाहेरगावी जायचे. मी आणि माझे दोन मोटे नाऊ आई. वडील, आजी- आजोबा असा आमचा परिवार. दोन भावांच्या पाठीवर नको असताना झालेल असे आम्ही कन्यारत्न पण शेंडफळ असल्यामुळे सर्वांनी माझा खूप लाड केला. माझ्या आजीनेच माझं नाव 'अंजली' ठेवल. बारसे तरं झालचं नाही. एक चुलता आहे पण असून नसल्यासारखा. आमच्याकडे त्याने कधीच लक्ष दिले नाही स्वताचा संसार आणि मुले एवढंच पाहिले.


आमचे आजोबा ह भ प व गावातील पुढारी असल्यामुळे त्यांच्या नावानेच आमची ओळख व्हायची 'शिक भाऊंची नात' आजोबांचे आमच्या शिक्षणावर खूप लक्ष होते. ते नेहमी म्हणायचे शिक्षणाला पर्याय नाही त्यांच्या प्रेरणेनेच उ पहिलीपासून शाळेतील प्रथम क्रमांक कधीच सोडलेला आठवत नाही आजोबांनी पहिलीपासून साठवून ठेवलेली प्रगती पुस्तक अजूनही माझ्या संग्रही आहेत भावंडाच्यात तीन नंबरला असल्यामुळे कायम त्यांची जुनी पुस्तके वापरली. वापरून शिल्लक राहिलेली वहीतील पाने शिवून नवीन वह्या तयार केल्या शाळेचे शर्टपण त्यांचेच घालायचे. खरोखरच.


 भावनांना कागदावर उमटवणे तितकेसे सोपे नसते अश्रूंना लपवण्याइतके ते सुद्धा कठीण असते.

प्राथमिक शिक्षण गावातीलच 'जीवन शिक्षण विद्या मंदिर' म्हणजे आत्ताच्या जि. प. प्राथमिक शाळेत अले बालवयात सौ .कुलकर्णी मॅडम यांनी चांगली शिस्त लावली. वर्षात हुशार असल्यामुळे प्रत्येक स्पर्धा परीक्षेला मला बसवायच्या. कधी कधी सणाला मला स्वतःच्या घरीसुद्धा घेऊन जायच्या. त्यावेळेस कसली गाईडस आणि कसल्या नोटस बाई शिकवतील तेच खरं. चौथीनंतर गावातीलच रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवनाथ विद्यालय यामध्ये इ. ५वी ला प्रवेश घेतला त्यावेळी ५ वी पासून "इंग्रजी' हा विषय होता- हायस्कूलच्या शिक्षकांनीही अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. श्री भोसले सरांमुळे इंग्रजी विषय अतिशय चांगला झाला स्पेलिंग पाठांतर नसल्यास उलट्या हातावर छड्या पण माझ्यावर ती प्रसंग कधीच ओढावला नाही. रयत शिक्षण संस्थेत गुरुकुल- मध्ये हुशार मुलामुलींची निवड केली जायची. पण मी मुलीची जात बाहेरगावी राहणार म्हणून मला गुरुकुलला पाठवलं नाही. पाठवलं असतं तर आज मी निश्चितच चांगल्या पदावर गेले असते.... हे सगळे नंतर कळले त्यावेळेस काही समजत नव्हत घरच्यांनाही त्याच काही गांभीर्य नव्हतं. माझी चित्रकला चांगली असल्यामुळे रांगोळी, चित्रकला स्पर्धेतील पहिला नंबर कधीच सोडला नाही. आमच्या चित्रकलेच्या सौ. पाटील मॅडमनी मला एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षांना बसवून यशस्वी केले या परीक्षेला वाईला जाव लागत असे त्यावेळी शहरातून आलेल्या मुलांकडे त्यांच्या चित्रकलेच्या साहित्याकडे आम्ही मोठ्या कुतूहलाने पाहायचो कारण आम्ही ते विश्व कधीच. अनुभवलेल नव्हते.


खेड्यातील राहणीमान असल्यामुळे शेजारच्यांना माझ्या शिक्षणातली प्रगती कधीच आवडली नाही मला अजूनही मी आठवीत असतानाचा एक प्रसंग आठवतो दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी असल्यामुळे शाळेचा गणवेश धुवायला टाकला होता आम्ही सर्वजन रंगीत कपडे घालून शाळेत गेलो होतो . आईने शर्ट व स्कर्ट स्वच्छ धुवून अंगणात जळणाचे पेटे ठेवले होते त्यावर सुकत घातला होता. माझ्या आळीतल्या मैत्रिणींचेही शर्ट तिथे ऊन लागत असल्यामुळे सुकत घातले होते. संध्याकाळी मी इस्त्री करण्यासाठी अंगणातील शर्ट आणण्यासाठी गेले आणि बघते तर काय माझ्या शर्टवर विघ्नसंतोषी अशा कोणीतरी हळद पाण्यात कालवून ओतली होती. हा सगळा प्रकार पाहून मी खूप मोठ मोठ्याने रडायला लागले आईने समजावलं, सगळ्यांनी समजावलं पण उद्या कपडे कोणती घालायची ? सर्वासमोर भाषण करायचं होतं. नवीन शर्ट आणण्याची ऐपत नव्हती आणि वेळही नव्हती. शेवटी आईने माझ्या गुरू मामाच्या घरी जाऊन त्याचा गठुड्यात बांधलेला शर्ट काढून आणला आणि घालायला दिला म्हणतात ना,


'जीवन किती खडतर आहे अनुभव तुला देत जाईल प्रयत्न करायला विसरू नको मार्ग तुला सापडत जाईल. '


घरातली कामे करून खूप खूप अभ्यास केला सुट्टीच्या दिवशी गुरे घेऊन डोंगरात जायचो लाकडे व शेणाची वाळलेली खांडे गोळा करायची कुणाची जास्त होणार याची स्पर्धा लावायची दिवाळीनंतर शाळेची सहल निघायची त्यामुळे घरच्यांना त्रास न देण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत दुसऱ्याच्या शेतात भांगलण करून पैसे मिळवायचो व सहलीला जायचो. आमची आजी आम्हाला नेहमी म्हणायची, " तुमच्या संपत्तीची वाटणी होते पण तुम्ही घेतलेल्या ज्ञानाची कधीच वाटणी होऊ शकत नाही. त्यामुळे भरपूर अभ्यास करा व शिका." हे तिचं वाक्य अजुनही माझ्या मनात घर करून आहे त्यामुळे मी माझं शिक्षण कधीच सोडले नाही दहावी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. आईला नेहमी वाटायच की मी

इतर मुलीप्रमाणे शिवणकाम शिकावे त्यामुळे तिच्या समाधानासाठी मी दहावी नंतर शिवणकामाचा तास लावला. पहिला ब्लाऊज आईसाठी शिवला तो तिने घातल्यावर तिला गगन ठेंगण झाल्यासारखे झाले आणि मलाही. शाळेमध्ये हुशार असल्यामुळे वडील र आजोबा यांना मी घरी राहणं पसंत नव्हते म्हणून यांनी आईच्या परवानगीने मला वाईच्या किसनवीर कॉलेज मध्ये घातलं. पण आईच्या आवडीसाठी मी माझ शिवणकाम चालूच ठेवल


कॉलेज जीवन काय असते याची काहीच माहीती नव्हती शाखा कोणती घ्यावी हेही समजत नव्हतं जिता व पूनम या दोन मैत्रिणींच्या सांगण्यावरून कला शाखेला प्रवेश घेतला. या दोघी अतिशय जीवलग मैत्रिणी झाल्या ज्यांच्यामुळे माझ्या जीवनाला खरी कला- टणी मिळाली. त्यामुळे त्यांच्याविषयी नेहमी वाटत -


आई म्हणजे

भेटीस आलेला देव

 पती म्हणजे

देवाने दिलेली भेट मित्रमैत्रिणी म्हणजे

देवालाही न मिळणारी भेट


निता व पूनमच्या घरची परीस्थिती चांगली व सर्व सुशिक्षित होते. प्रत्येक गोष्टीत मला मदत करायला त्या सदैव तयार असायच्या मला करीअरचा मार्ग त्यांच्यामुळेच मिळाला. नाहीतर मी प्लेन BA च झाले असते. १२ वीची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. निताच्या तिच्या घरच्यांच्या सांगण्यावरून आम्ही डी. एड चा फॉर्म भरायचे ठरवायें यामध्ये इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण असेल तर 3 गुण जास्त धरत होते माझे ते प्रमाणपत्र हायस्कूलमध्येच होते बऱ्याच वेळा पाठपुरावा केला तरी मिळत नव्हते. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आली निताने आधी मी शाळेत फोन केला तर. कपाटांचा नवीन क्लार्कने चार्ज घेतला नाही.

अशी उत्तरे मिळाली. मुख्याध्यापकांनी नंतर तर फोन उचलून बाजूला ठेवला. निता आणि मी STD बुथमधून तड़क पोलिस स्टेशनला गेलो. आम्ही रडत असल्यामुळे सर्वजण आमच्याभोवती जमले. आम्ही घडलेली हकीकत सांगितली त्यावेळेस शाळा सुटण्याची वेळ झाली होती. त्यामुळे फौजदाराने एका हवालदाराला छोट्या गाडीवर पुढे शाळा बंद न करण्यासाठी पाठवले. सर्व स्टाफला थांबवून ठेवण्यात आले होते. आम्ही पोलिसगाडीतून हायस्कूलवर पोहोचलो. एरव्ही फोनवरून उडवाउडवीची उत्तरे देणारे मुख्याध्यापक आमची प्रेमाने विचारपूस करत होते .कपाटाचे कुलूप फोडून  त्याचा पंचनामा करून मला एकदाचे सर्टीफिकेट मिळाले. गावात आमची सर्वत्र चर्चा सुरू आली. अशा प्रकारे संकटाशी सामना करून आम्ही डी. एड चा फॉर्म भरला. झगडल्याशिवाय कधीच काही मिळाल नाही. पण खरचं 

जे घडतं त्यातून आपल्याला एक मार्ग मिळती मिळालेल. मार्ग आपल्याला जीवनाची दिशा दाखवतो


अखेर डी. एड. ची गुणवत्ता यादी लागली. माझे नाव पहिल्याच यादीत होते. नंतरच्या यादीत मैत्रिणीची नावे आली. अँडमिशन घेण्यासाठी औरंगाबादला जावे लागले. त्यावेळेस वडील खूप आजारी होते. तरीही ते माझ्या बरोबर आले . लांबच्या प्रवासामुळे त्यांच्या पायावर सूज चढली. तिथे गेली तर समजल की, मुलाखतींना स्थगिती आली आहे. रास्ता रोको केल. घोषणबाजी केली. पण सार काही व्यर्थ. विनाकारण खर्च व त्रास झाला .पण आम्हाला अस सहजा सहजी काहिच मिळणार नव्हते. पुन्हा तब्बल एक महिन्याने औरंगाबादला जाऊन अॅडमिशन घेतले. व जिजामाता अध्यापक कॉलेज, सातारा येथे प्रवेश घेतला. हॉस्टेलला राहायची ऐपत नव्हती मग रोजचा प्रवास सुरू झाला. कॉलेजची शिस्त अतिशय कडक होती. शनिवारच्या कॉलेजला यायला खूप त्रास व्हायचा. वडील आणि मी सकाळी ५ वाजता पसरणीहून वाईपर्यंत चालत यायचो . कारण घरात गाडी नाही. एवढ्या सकाळी कोणाची गाडी मिळणार ना. पण मनात जिद्द होती खूप खूप शिकण्याची म्हणतात ना -


" मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनों से जान होती हैं। पंख होने से कुछ नहीं होता

होसलों से ऊँची उड़ान होती है।'


 कॉलेजचे एक दोन महीने गेल्यानंतर आमच्याच नात्यातल्या एका शिक्षक मुलाचं स्थळ माझ्यासाठी आल. त्यांचं गाव साताऱ्याच्या शेजारी होते. माझे आजोबा व वडिलांनी विचार केला की स्थळही चांगलं आहे आणि पोरीला तिथून कॉलेजला जायला सोप पडेल. झालं सगळ्या मैत्रिणीच्या लग्नाच्या आधी आमच्या लग्नाचा बार १८ वर्षे १० महिने वय झाल की वाजला. १५ मे २००१ रोजी लग्नसोहळा दारातच वडिलांच्या ऐपतीप्रमाणे पार पडला. सासरच्या मंडळीकडून आजोबांनी शिक्षण पूर्ण करण्याचे वचन घेतले होते .आमचा संसार आणि शिक्षण सुरू झाले आणि खऱ्या अर्थाने एक स्त्री असल्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली. माझं मन मला नेहमी म्हणायचं-


नको रडू

स्त्री जन्मा तुझी कहाणी म्हणत तू 

शोध घे स्वतःचा

एक नवीन कहानी लिही तू '


कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांचे गाव, कृष्णा नदीच्या ' तीरावर वसलेलं 'मर्ढे' हे माझे सासर, गावात एस. टी.ची सोय नाही. माझे पती कोल्हापूरला नोकरीला. आठवड्यातून एकदाच सुट्टीला घरी येणार . घरात आजसासू, सासू -सासरे, चुलत सासू-सासरे, चुलत दीर, मोठे दीर-जाऊ, पुतणी एवढा मोठा परिवार. घर फक्त ७ खणांचं. येता जाता माणसं एकमेकांना धडकायची. पसरणीतील घर मोठ असल्यामुळे माझी घरात खूपच कसरत व्हायची. मर्ढे गांव घोशा पद्धतीचे असल्यामुळे डोक्यावरून पदर घेऊन घरातून बाहेर पडावे लागे. कॉलेजला ड्रेसचा दिवस असला की. ओढणीही डोक्यावर घेऊन जावे लागत होते. एस. टी. साठी मर्ढे ते आनेवाडी दिड किलोमीटर चालायला लागायचे. पावसाळ्यात खूप पाऊस झाला आणि नदीच्या पुलावरून पाणी आले की, आमची वरात खडकी गावाच्या पुलावरून निघायची. किती ही अडचणी आल्या तरी डगमगायच नाही अशी जिद्द मनी ठेवली होती.


इरादे अगर नेक हो तो. सपने भी साकार हो जाते हैं। 

मन में अगर सच्ची मेहनत की चाह हो 

तो रास्ते भी आसान होते हैं।


मान मोडेपर्यंत खूप खूप अभ्यास केला. पहाटे 2.30 ते ५ वाजेपर्यंत अभ्यास करायचा. घरातल आवरायचं आणि कॉलेज गाठायचं. परीक्षाच्या दिवसात तरी काम करायचं अगदी जीवावर यायचं पण निभावून नेल सारं. चपाती, भाकरी करत करत पुस्तक वाचायची. का तर आपला वेळ वाया जावू नये, रस्त्याने जाता येताना, वाचण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे हातावर लिहून घ्यायचे .कारण इतर मुलीपेक्षा मला वेळ कमी मिळत होता .म्हणूनच मिळालेल्या वेळेचं सोनंच करायच ठरवलं होत. कधी मनात काही विचार आलेच तर माझ्या सर्व पुस्तकांवर मी संत तुकाराम महाराजांची पुढील वाक्ये प्रेरणेसाठी लिहिलेली होती-


असाध्य ते साध्य । करीता सायास

 कारण अभ्यास ।

 तुका म्हणे ॥


अखेर माझ्या कष्टाच सोनं झाल .डी.एड् . चा निकाल लागला. फक्त १ गुणांनी माझा १ ला नंबर जाऊन दुसरा नंबर कॉलेजमध्ये आला. यानंतर शिक्षकांच्या भरतीची जाहिरात वाचून सातारा जिल्हा परिषदेचा अर्ज भरला. मुलाखतीचा कॉल येईपर्यंत घरातील, शेतातील काम केली. गावातील शाळेत शिक्षक रजेवर असताना अध्या- पनाचे कामही केले. त्यावेळेचे विद्यार्थी भेटल्यानंतर अजुनही मान देतात. ४ डिसेंबर २००४ रोजी सातारा जि. प. मध्ये मुलाखत झाली वाई तालुक्यातील कोचळेवाडी या शाळेत उपशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. मांढरदेवच्या काळुबाईच्या छत्रछायेखाली माझं शिक्षक व्यक्तिमत्त्व बहरून नावारूपाला आले. द्विशिक्षकी शाळा असल्यामुळे शाळेशी निगडीत सर्व बाबींची माहिती झाली. निष्ठेने आणि कष्टाने केंद्रात शाळा १ नंबरला आली. त्यावेळेचे सातारा जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जगदीश पाटील यांनी आमच्या कामाच कौतुक केले. डोंगराळ भागातील शाळा असूनही मुले खूपच हुशार आहेत असे प्रत्येकाचे म्हणणे होते. नोकरीची जबाबदारी सांभाळत सांभाळत एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पत्रकारीतेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून कॉलेज- मध्ये पहिली आले. शाळा व्यवस्थापन पदविकेमध्येही कॉलेजमध्ये पहिली येण्याचा मान मिळाला. लढायचं आणि खूप शिकायच हे ठरवलं होतंच.


वाई तालुक्यातून विनंती बदलीने जावली तालुक्यात आले. माझं मोठ भाग्य म्हणून मला कापसेवाडी ही मोठी शाळा मिळाली. आश्रमात राहणारी मुले या शाळेत शिकण्यासाठी येत होती. या मुलांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्या अनाथ, गरीब, होतकरू मुलांची आम्ही सर्व शिक्षक माय झालो. म्हणतात ना....


भरवी घास इवलासा तिच्या मायेची रीतच न्यारी 

स्वतः उपाशी राहूनही

लेकरास ठेवी आहारी..... 


आम्ही सर्वजण मिळून त्यांच्यासाठी पैसे गोळा करून वेगवेगळे उपक्रम राबविले. मुलांच्यात खिलाडू वृत्ती चांगली असल्यामुळे खेळाच्या माध्यमातून शाळा नावा- रूपाला आणली. पण या मुलांची जास्त सेवा करणे नशिबात नसल्यामुळे प्रशासकीय बदली होऊन सोनगांव शाळेत हजर झाले. सन २०१५-१६ चा पंचायत समिती जावलीचा 'आदर्श शिक्षक पुरस्कार' याच शाळेत मिळाला .

आपल्या शालेय जीवनातल्या गुरुजींना बाईना आपण कधीच विसरत नाही. बाई, मॅडम होण्याचं भाग्य मला मिळालं. जीवंत कलाकृती यशस्वीपणे घडवण्याच बळ मला चिरंतन मिळो एवढीच इच्छा आहे .मला खेळाची आवड असल्यामुळे शिक्षकांच्या सर्व क्रीडास्पर्धेत भरपूर बक्षीसे मिळवली. खो खो, कबड्डी , दोरउडी खेळाची राज्यपंचपरीक्षा ही चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. महिला पंच म्हणून अनेक सामने खेळविले. यावेळेस खरच असे वाटले-


आपली संकटे ही आपली ओळख

असता कामा नये.

आपला झगडा ही आपली ओळख

असता कामा नये. आपल यश हीच आपली ओळख असली पाहिजे.

सोनगाव शाळेतून माझी बदली बिरामणेवाडी शाळेत झाली सुरुवातीला दोन शिक्षकी असणारी ही शाळा नंतर मात्र चार वर्ष मी एकटीने सांभाळली . त्या शाळेचे मी सर्वस्व झाली . गावकरी ,तिथल्या महिला यांच्याशी एकरूप झाले आणि शाळेचे नाव आणखीनच सर्व स्पर्धेत उंचावलं गेलं या शाळेने ही मला सर्वस्व दिले .या शाळेत अजूनही मी ज्ञानदानाचे कार्य करत आहे .छोटीशी वाडी असूनही या शाळेतील या गावातील लोकांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा आपल्या गावच्या विकासाप्रति असलेली निष्ठा अतुलनीय आहे.


आपण इतरांपेक्षा कशातही मागे राहू नये अस नेहमी वाटायचं. मोठ्या जिद्दीने दोन चाकी व चार चाकी वाहने चालवायला शिकले . अजूनही माझं शिक्षण मी सोडले नाही.पुणे विद्यापीठात Phd साठी मराठी विषयातून प्रवेश घेतला आहे.सदैव प्रेरणा देण्यासाठी माझे पती व कुटूंबिय सदैव पाठीशी आहेत .माझ्या दोन मुलांनी मला मातृत्वाचं सुख दिलं. माझं हे यश, सुख पाहण्यासाठी आई वडील मात्र नाहीत याची मनाला सतत हूरहूर राहील .अशा प्रकारे कडू गोड अनुभवातून माझे आत्तापर्यंतचे जीवन साकारत आले. अनेकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. 

प्रत्येकातून चांगलं तेच वेचलं. मला यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या हातांची मी शतशः ऋणी आहे ..शेवटी एवढंच वाटतं की,


आकाशात झेप घ्यायची असेल तर,

त्याची उंची कधी मोजू नये.

सागरात झेप घ्यायची तर, त्याची खोली कधी मोजू नये. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसांनी ध्येय साध्य करताना वादळवाऱ्याची, संघर्षाची कधीच पर्वा करू नये......








Friday, October 21, 2022

हाती ज्यांच्या शून्य होते १०



 १} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक   :-१०

४} पुस्तकाचे नाव      :-  हाती ज्यांच्या शून्य होते

५)एकूण पृष्ठ संख्या :-  २३२

मूल्य        २००    :- ₹  फक्त


पुस्तक परीक्षण 

हाती ज्यांच्या शून्य होते


     प्रत्येक मानवाला एक सुंदर आयुष्य मिळालेलं असतं आणि ते आयुष्य आपण आपल्या परीने जगत असतो कधी कधी आपण खूप आनंदात असतो आणि कधी कधी आपण खूप नैराश्यात जातो आणि हे जीवन नकोसं होतं. नैराश्यात गेलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे कारण या पुस्तकाचे नावच अगदी समर्पक आहे हाती ज्यांच्या शून्य होते. अरुण शेवते यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. एकूण २१ पाठांमध्ये हे पुस्तक विभागलेले आहे. त्या पाठांनाही समर्पक शीर्षके देण्यात आलेली आहेत.

अनेक मोठ मोठ्या लेखकांनी या पुस्तकात आपल्या आवडीच्या कर्तृत्ववान अशा व्यक्तींचा परिचय करून दिलेला आहे.

    पुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक भागामध्ये एका दैदिप्यमान मानवाचे दर्शन आपल्याला होतं. हाती ज्यांच्या शून्य होते या पुस्तकाचे लेखन करण्यासाठी वि.ग .कानेटकर ,के .जे .पुरोहित, लता मंगेशकर, ग .दि. माडगूळकर, गुलजार, सुधीर फडके ,निळू फुले, शामला शिरोळकर, दारासिंह, मनमोहन सरल, एन. डी. पाटील, कुमार केतकर, चार्ली चापलीन, सुशील कुमार शिंदे, दिनकर पंड्या, स्टीव्ह जॉब्स, मुकेश माचकर या लेखकांनी या पुस्तकात जीवनात घडलेल्या प्रसंगांचे लेख लिहिलेले आहेत . या पुस्तकातील सर्वच लेख वाचनीय आणि प्रेरणादायी आहेत प्रत्येक लेखासाठी समर्पक शीर्षक दिलेल दिसून येतं.

       पोस्टमास्तर ते  राष्ट्राध्यक्ष, नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती होतो, खाटीक खाण्यात ते नाट्यगृह, मुक्काम कोल्हापूर ,मंतरलेले दिवस, मोटार, गॅरेज आणि गाणे, चहाभाजीचा व्यापार ,अकरा वर्ष माळी होतो ,विष्णुपंत :छत्रे ग्रँड इंडियन सर्कस, आखाडा आणि कुस्ती ,हुसेन चा शंभर कोटीचा प्रवास ,नांगर, कंदील आणि रयत, ग्रेटा कार्बो नावाचे वादळ, मी, कोर्टाच्या आवारात, नांगर कारखान्याचा जन्म ,साखर कारखान्याची उभारणी, रिलायन्स ची निर्मिती, चुका कराल तरच घडाल, सकाळी केव्हातरी उजाडेल, शून्यातून प्रगती अशी प्रेरणादायी नावे प्रत्येक लेखाला दिलेली आहेत. काही लेखकांनी दुसऱ्याच्या जीवनातील प्रसंग लिहिलेले आहेत .तर काही लेखकांनी स्वतःच्या जीवनातील आत्मकथनपर प्रसंग या पुस्तकात वर्णन केलेले आहेत. खूप सुंदर आणि प्रेरणादायी असे पुस्तक आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच अरुण शेवते यांनी आपल्या आईला समर्पित केली आहे .ते म्हणतात "माझी आई अनुसयाबाई दिगंबर शेवते लग्नानंतर दहा वर्षांनी सातवीची परीक्षा दिली शून्यातून स्वतःचे घरटे उभारलं." आपल्या आईच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग त्यांनी दिला आणि इतरांना त्यातून प्रेरणा घेण्याची एक नवीन ऊर्जा त्यांनी दिली.

       आपल्या मनोगतात ते म्हणतात ,"कर्तृत्ववान माणसाचे वैभव दिसते. त्या ऐश्वर्याच्या मागे दडलेला अंधार कुणाला दिसत नाही. अंधाराला छेद देऊनच माणसे मोठी होतात." जीवनात मोठ्या मोठ्या झालेल्या कर्तृत्ववान माणसांच्या आयुष्यातील प्रसंग या पुस्तकात दिलेले आहेत हे पुस्तक वाचून नैराश्यात गेलेल्या प्रत्येक माणसाला आयुष्यात येऊन काहीतरी करण्याची उर्मी उत्पन्न होईल.

     पहिल्या प्रसंगात अब्राहम लिंकन यांची माहिती दिली आहे. पोस्टमास्तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवास त्यांचा मांडलेला आहे .त्यांनी गुलामांना स्वातंत्र्य मिळवून दिले याचे वर्णन केले आहे.

ए.पी.जे. अब्दुल कलाम

वडील नावाडी होते.

विद्यार्थिदशेत असताना ते रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्र विकत होते.

ते शास्त्रज्ञ झाले.

भारताचे राष्ट्रपती झाले.


शेक्सपिअर

खाटीकखान्यात नोकरी करत होते. रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभाळता सांभाळता एका नाटककाराचा जन्म झाला.


लता मंगेशकर

वडील वारल्यावर त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी केली. कष्टात दिवस काढले. घर सांभाळले. विविध भाषेत पन्नास हजार गाणी म्हटली. भारतरत्न हा त्यांना सर्वोच्च किताब मिळाला.


ग. दि. माडगूळकर

मॅट्रिक नापास झाल्यांवर उदबत्त्या विकल्या. अनवाणी आयुष्य जगले. त्यांनी गीतरामायण लिहिले.


गुलजार

फाळणीनंतर दिल्लीला आले. दिल्लीहून मुंबईला आले. मोटार गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल रॉय भेटले. मोटार गॅरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रीत आले.


सुधीर फडके

चहा भाजीचा व्यापार करत होते. प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी बाद्यं विकावी लागली. भटकंतीतून त्यांनी सूर शोधला. ते गायक झाले, संगीतकार झाले.


निळू फुले

पुण्याला कॉलेजमध्ये अकरा वर्षं माळी होते. झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले. नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले.

विष्णूपंत छत्रे

घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वतःच स्वतःचा मार्ग शोधला. भारतातील पहिली ग्रेड सर्कस निर्माण केली.


दारा सिंह

पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते. रानात गुरं चरायला घेऊन जात होते. गुरांना सांभाळता सांभाळता त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली. जगभर कुस्त्या जिंकल्या. चित्रपटात कामे केली. राज्यसभेत खासदार म्हणून जाताना त्यांच्या मनात एकच भावना असते- एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला.


एम. एफ. हुसेन

मुंबईच्या फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स रंगवली. पुढच्या आयुष्यात त्यांची शंभर चित्रे शंभर कोटींना विकली गेली. भारतात चित्रकलेच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला गेला.


कर्मवीर भाऊराव पाटील

कंदील आणि नांगराचे विक्रेते होते. कंदील नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली.


ग्रेटा गार्बो

गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला. तेराव्या वर्षी गरिबीमुळे शाळा सांडावी लागली. दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असतांना अचानक • हॉलीवूडचे दरवाजे उघडले.


चार्ली चॅपलिन

प्रचंड गरिबी अनुभवली. विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासून अनेक कामे केली. आपल्या विनोदाने जगभरच्या लोकांना हसवले.


सुशीलकुमार शिंदे सोलापूरला कोर्टात शिपाई होते. कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

लक्ष्मणराव किर्लोस्कर दहा वर्ष ड्रॉईंग टिचर होते. त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला.


यशवंतराव गडाख

अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते. मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले. वयाच्या पंचविशीत सोनईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली.


धीरुभाई अंबानी

वडील प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग ऑफिसात नोकरीला होता. स्वतः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते. अशा वातावरणात त्यांनी स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले.


स्टीव्ह जॉब्स

कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले. जगातल्या मोठ्या कॉम्प्युटर कंपन्यांपैकी एक ' अॅपल'ची स्थापना केली.


सुनील दत्त

रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले.


जॉनी वॉक

बस कंडक्टर होता. प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकीटे लोकांनी घ्यायला सुरुवात केली. एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर स्थिरावला.


महेमूद

ड्रायव्हर होता. चलती का नाम गाडी, सबसे बडा रुपय्या त्याने म्हणायला सुरुवात केली. आणि गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते स्वतःलाही समजले नाही.

या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शून्य होते. त्यांनी अथक परिश्रमाने शून्यातून विश्व निर्माण केले. अनवाणी आयुष्याला आकार दिला. परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसांपुढे आदर्श ठेवला.


प्रत्येक लेखकाची आपली स्वतःची अशी लेखन शैली दिसून येते. आपल्या भावभावना जीवनातील प्रसंग अगदी हुबेहूब रेखाटलेले आहेत. हे पुस्तक वाचून एवढ्या मोठ्या माणसांच्या किती बिकट प्रसंग आलेले असतील हे समजून येते. वयाच्या प्रत्येक पायरीवर असणाऱ्यांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे. प्रत्येक घटना, प्रसंग आपल्या आयुष्याशी निगडित आहे असे वाचताना वाटते. या पुस्तकात आलेल्या सर्व माणसांच्या हातात शून्यच होता. शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती या पुस्तक वाचनातून मिळते.

        पुस्तकाची बांधणी छान आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप सुंदर आहे .त्यावर पुस्तकात असलेल्या महान व्यक्तींची छायाचित्र दिलेली आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर प्रत्येकाच्या आयुष्यात एवढी मोठी व्यक्ती असून ते नक्की कोणतं काम करत होते याची एका ओळीत माहिती दिली आहे. त्यामुळे पुस्तक पाहता क्षणी ते वाचण्याचा मोह होतो. मुखपृष्ठाची मांडणी सतीश भावसार यांनी केलेली आहे पुस्तकाचे प्रकाशन स्वतःच अरुण शेवते यांनी केलेलं आहे .ऋतुरंग प्रकाशन गोरेगाव मुंबई या प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. या पुस्तकाची २५ वी आवृत्ती जानेवारी २०१३ ला आलेली आहे. पुस्तकाची एकूण पृष्ठ संख्या २३२ आहे. सर्वांनी वाचाव असं हे पुस्तक आहे. प्रत्येकाच्या संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे.


संपादन :-अरुण शेवते

प्रकाशन :-ऋतुरंग प्रकाशन गोरेगाव मुंबई

मुखपृष्ठ व मांडणी :-सतीश भावसार

किंमत:- दोनशे रुपये


Thursday, June 9, 2022

पसरणी गावची गौरव गाथा 9



 

१} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)

३} पुस्तक क्रमांक     :-  9

४} पुस्तकाचे नाव      :-  पसरणी गावची गौरव गाथा

५ } लेखक         :- श्री.शिवाजीराव शिर्के

६} प्रकाशक              :-प्रवीण प्रकाशन पुणे

७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021 प्रथमावृत्ती

८} एकूण पृष्ठ संख्या :-  104

९} मूल्य        150       :- ₹  फक्त


 *पसरणी गावची वाचता गौरव गाथा* 

 *तिच्या चरणी होतो माझा लीन माथा*


सह्याद्रीच्या कुशीत आणि कृष्णा नदीच्या मुशीत वसलेलं पसरणी हे माझं माहेर . नावाप्रमाणेच चौफेर पसरलेलं आणि वस्ती केलेलं पसरणी हे गाव . घरांची वस्ती चहुबाजूने पसरली तशीच पसरणी च्या नावाची कीर्तीही सार्‍या जगतात पसरलेली आहे . अजूनही मराठी लोकसंस्कृतीत जागरण आणि गोंधळ घालताना पसरणीच्या भैरीदेवाला आठवणीने जागराला बोलवलं जातं आणि या गीताचे सारे श्रेय पद्मश्री आदरणीय शाहीर साबळे यांना दिलं जातं .

हे झालं लोकसंस्कृती आणि शाहीरीचं तसेचं आधुनिक बांधकाम क्षेत्रात पद्मश्री बी .जी. शिर्के यांचं नावही मोठ्या गौरवाने आणि अभिमानाने घेतले जात . हे नाव उच्चारताच अंगावर रोमांच उभा राहतो तो म्हणजे  अभिमानाचा आणि शौर्याचा, कर्तुत्वाचा, कीर्तीचा.

 *मा* मातृत्वाचं आणि पितृत्वाचं लेणं

जिथल्या कुशीत मिळतं ते ठिकाणं

 *हे* हेवा वाटतो प्रत्येकिला आपल्या बालपणीच्या आठवणींचा

 *र* रमतं जिथं मन आणि मिळतो चार दिसांचा विसावा असं हळवं घर


 पसरणी गावची गौरव गाथा हे पुस्तक आदरणीय शिवाजीराव शिर्के यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे तसं बघायला गेलं तर  गावचा सारा इतिहास आणि गौरव ग्रंथ याला म्हणावे लागेल. अजूनही या पुस्तकात दिवसेंदिवस अनेक हिरे मानके जोडली जातील. असाच गौरवशाली इतिहास या गावाचा आहे .सुरुवातीलाच या पुस्तकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील यांचे शुभेच्छा संदेश लाभले आहेत. हा गौरव ग्रंथ लिहिण्यासाठी पसरणी गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांनी मदत केली त्यांनाही मानाचा मुजरा याठिकाणी करण्यात आलेला आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर  गावचे आराध्य दैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा सुंदर फोटो तसेच श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीची प्रतिमा याठिकाणी छापलेली आहे .गावातील साजरे होणारे उत्सव यांच्या प्रतिमाही पुस्तकात  दिलेल्या आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखकांचा संक्षिप्त परिचय देण्यात आलेला आहे .हे पुस्तक प्रवीण प्रकाशन शिवसुमन फुगेवाडी पुणे या ठिकाणाहून प्रकाशित करण्यात आलेले आहे. या पुस्तकामध्ये एकूण 27 प्रकरण केलेली आहेत आणि त्यामध्ये  गावातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, ठिकाण, महात्म्य, इतिहास यांचा इतिवृत्तांत देण्यात आलेला आहे.

पसरणी गावाचा नकाशा सुरुवातीला त्या पुस्तकात देण्यात आलेला आहे यामुळे पसरणी गावाचे पर्यटन करताना कोणती स्थळ कोणत्या ठिकाणी आहेत हे आपल्याला समजून येते. या गौरव ग्रंथाला प्रस्तावना आदरणीय जगन्नाथ बाबुराव मुळीक सर यांनी आपल्या खास शैलीत दिलेली आहे. तसेच सुप्रसिद्ध लेखक व निवेदक आदरणीय  श्रीकांत चौगुले यांनी या पुस्तकासाठी आपला अभिप्राय लिहिलेला आहे.

सातारा जिल्ह्यात, वाई तालुक्यात असलेलं पसरणी हे माझं गाव, सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेलं गाव. ऐतिहासिक इतिहासाने गाजलेलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, छत्रपती शाहु महाराजांनी, नबाब, रघुनाथ स्वामीला वास्तव्याला दिलेलं, आणि कृष्णा नदीचा परिसर लाभलेलं, सृष्टी सौंदर्याने बहरलेलं माई पसरणी गाव मला फार, फार मनापासून आवडते.

प्राचीनकाळी विराटनगरी, दक्षिण भारताची काशी अशी वाई प्रसिध्दीस आलेले शहर  छ. शाहु महाराजांचे मातब्बर सरदार भिकाजीराव रास्ते यांनी • कृष्णातीरावर अनेक मंदिर बांधून पवित्र केलेले शहर. वाई शहराच्या पश्चिमेस ५ किलोमीटर अंतरावर पसरून वस्ती केलेलं पसरणी हे गाव. गावाला व गावच्या वैभवाला इतिहास आहे. गावामधील बहुसंख्य शेतकरी शेतात घरे बांधून वस्ती करून राहिलेले आहेत. गावांत रघुनाथ स्वामींनी बांधलेला रामाचा मठ आहे. गावाशेजारीच काही अंतरावर नबाबाचा बंगला आहे. या बंगल्यातून तो ४२ गावांचा कारभार पाहत होता. आता तो धोम धरणग्रस्तांनी विकत घेऊन त्यात ते राहत आहेत.


पसरणी गावाजवळच असणाऱ्या सोनगिरी व गाव डोंगराच्या घाटातून महाबळेश्वर, पांचगणीला जाणारा रस्ता आहे. वाई शहराची हद्द संपली की, पसरणी घाटाला सुरूवात होते. सुरूवातीलाच पसरणी घाट, वेडी वाकडी वळणे, “वाहने सावकाश हाका!" असा बोर्ड वाचावयास मिळतो. घाट पार करीत असतांना मध्यंतरी बुवासाहेबाचे मंदिर लागते. देवास नमस्कार करून रुपया, आठ आणे

टाकून प्रवासी पुढे प्रवासाला निघून जातात. या बुवासाहेब देवाबद्दल एक आख्यायिका सांगण्यात येते. एक इंग्रज आपल्या घोड्याच्या बग्गीमधून पैसे, दागिने, अनेक मौल्यवान वस्तू घेऊन महाबळेश्वरला चालला होता. त्याने या देवास लाथ मारली आणि पुढे प्रवास करू लागला. घाटातील मोठ्या मोरीजवळ येताच आकाशांत अचानक पावसाचे ढग जमा होऊन जोराचा पाऊस झाला व त्यात तो वाहून गेला. त्याच्या अनेक वस्तू अजूनही सापडतात, असे जुने, जाणकार लोकांकडून सांगितले जाते.


पुढे गेल्यावर डोंगराच्या माथ्यावर सपाट मैदान लागते. यास “थापा” असे नाव आहे. या थाप्यावरून वाई शहर आणि कृष्णानदीचे पात्र, पांडवगड, तसेच धोम धरणाचा सुंदर जलाशय, चमकणाऱ्या मोत्याप्रमाणे दिसतो. पसरणी गावातील घरे काड्यापेट्या विस्कटून टाकल्या प्रमाणे दिसतात. ऊसाची शेती निळसर, लाल तुऱ्यांनी खुलून दिसते. हिरवी, पिवळी भात खाचरे, हिरवेगार डोंगरातून शेतातून जाणाऱ्या पाऊलवाटा दिसतात. "महाराष्ट्राचे काश्मीर" 'म्हणून ओळखला जाणारा महाबळेश्वरचा भाग लाभलेल्या निसर्ग सौंदर्यामुळेच हा परिसर प्रत्येकाच्या मनाला खिळवून ठेवतो.


पसरणी गावाशेजारील गाव डोंगरामध्ये मी लहानपणी शाळेत असतांना शेळ्या, गुरे, बैले चारावयास घेऊन जात होतो. त्यावेळी प्राथमिक शाळा ही माझ्या घराशेजारीच गोपाळराव पानसे यांच्या वाड्यामध्ये भरत होती. नंतर ती मारुती मंदिराशेजारी भरू लागली. कालांतराने गाव ओढ्याजवळच गावकऱ्यांनी मोठी वास्तू बांधली. त्यांत १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंत शाळा भरते. हनुमान मंदिरा पाठीमागे बारवेची विहिरीच्या ठिकाणी काळभैरवनाथ प्रगटले अशी आख्यायिका आहे.

एवढं सुंदर वर्णन आदरणीय शिवाजीराव शिर्के यांनी आपल्या गावाबद्दल केले आहे .याच पुस्तकात माझे आजोबा शिर्के भाऊ आणि पणजोबा यांचीही शौर्यगाथा लिहिली आहे.


१)पसरणी गावची पूर्वपीठिका


२)गावची मंदिरे-इतिहासाच्या पाऊलखुणा


३)काळभैरवनाथाचे माहात्म्य ४)निसर्ग सौंदर्य लाभलेले पसरणी गाव


५)माझे गाव पसरणी-बी.जी. शिर्के 


६)शोध आदर्श व्यक्तिमत्त्वांचा (गावची व्यक्तिमत्त्वे) 


७) क्षेत्र पसरणी काळभैरवनाथ माहात्म्य

८) पंच्याहत्तर वर्षापूर्वीचे पसरणी गाव


९) पसरणी गावचा सांस्कृतिक इतिहास १०) पसरणी गावची भैरवनाथ यात्रा


११) पसरणी गावचे उज्वल भविष्य


१२) हिंदू-खाटीक यांचे भैरवनाथ श्रध्दास्थान


१३) माझ्या आठवणीतील पसरणी गाव


१४) पसरणी गावची कहाणी


१५)श्री क्षेत्रपाल भैरवाचे वैभव


१६) पसरणी ग्रामपंचायत माहिती


१७) गावातील पतसंस्था, ट्रस्ट, संस्था


१८) विकास सेवा सोसायटी- गावच्या विकासाची गंगोत्री १९) पसरणी गावची माहिती - काव्यात


२०) महाराष्ट्र राज्य माहिती


२१) गावची आदरणीय प्रभावी व्यक्तीमत्त्वे


२२)एक सत्यशोधकी कार्यकर्ता-वरखडे गुरूजी 

२३) प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व- प्रदीपकुमार महांगडे


२४) पसरणी गावची ठळक वैशिष्टे


(२५) गावचा अभिमान-अभिनेत्री अश्विनी महांगडे


२६) पसरणी गावच्या यात्रेचं महत्व


२७)भैरवनाथ विद्यालय पसरणी जन्मकथा

एवढी विस्तृत माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे ही सारी माहिती संकलित करण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे या सर्वांचे शेवटी विशेष आभार मानण्यात आलेले आहेत यामध्ये गावातील सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे खरोखरच अभी अभिमान वाटावा अस माझं माहेर आणि असं हे पुस्तक साहित्य नगरी प्रसिद्ध होईल आणि गौरव गाथा दस देशातून सदोदित निनादत राहील सर्वांनी वाचावे समजून घ्यावं असे हे पुस्तक मी वाचलेले पुस्तक आणि थोडक्यात त्याचे परीक्षण याठिकाणी केले माझ्या परीक्षणापेक्षाही खूप मोठं गाव आणि त्यातील माणसं . या सर्वांना  पुन्हा एकदा माझा हृदय पुर्वक मानाचा मुजरा.

🌹 *माहेर माझं पसरणी*🌹


माझ्या माहेराची वाट

झाडी हिरवीगार दाट

आठवते मला नित्यरोज

माहेराची रम्य पहाट


   पाखरांची होते किलबिल

   मंदिरात ढोलताशांचा नाद

   घरोघरी प्रज्वलीत चूल

   मंजूळ वारा घालतो साद

 

माझ्या माहेराला आहे

कृष्णाबाईचा भव्य काठ

साऱ्या जगतात आहे

माझ्या माहेराची मान ताठ


   चौफेर पसरली आहे

   माझ्या माहेराची अमृत वाणी

   त्यावरूनच नाव गावाचे

   निसर्गरम्य माझी पसरणी

 

माझ्या माहेराला आहे

मोठा ऐतिहासिक वारसा

दिमाखात उभा आहे

नबाबाच्या बंगल्याचा आरसा


   उद्योगपती शाहीरांनी

  पसरवली माहेराची किर्ती

  दोन पद्मश्री असलेले

  पहिल गाव माझं सत्कारमूर्ती


पांचगणी महाबळेश्वरला जाणारा

भव्य दिव्य पसरणी घाट

माझ्या माहेराचा दाखवतो

सुखसमृद्धिचा थाट


  साऱ्या पंचक्रोशीत भरतो

  माहेराचा मोठा दसरा

  नाथसाहेबांच्या भक्तीरसात

  आनंदून जातो गावसारा


माझ्या गावची यात्रा

जपे साहित्य संस्कृतीचा वारसा

नव्या युगातील घडतो तिथे

मायावी नगरीचा जलसा


   परक्या मुलुखात राबतो

   माहेराचा माझ्या कष्टकरी हात

   वाट पाहतो त्यांची

  जन्मदायी माता आणि तात


लक्ष ठेव साऱ्या गावावर

जागृत देवा माझ्या भैरोबा

सुखासमाधानाने नांदू दे

घराघरातील घरोबा


   पून्हा पून्हा जन्मा यावे

   पसरणीआईच्या काळया कुशीत

    जीवन आपले सार्थ करावे

   जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात


✍🏻 *अंजली गोडसे( शिर्के)*✍🏻

       *मर्ढे ( सातारा)*


शिक्षण 8



 

१} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  8

४} पुस्तकाचे नाव      :-  #शिक्षण #मनीष #सिसोदिया

५ } अनुवाद          :-  राहुल केशव कदम

६} प्रकाशक              :- मनोविकास प्रकाशन पुणे

७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021 

८} एकूण पृष्ठ संख्या :-  148

९} मूल्य        170  ₹  फक्त


माणूस जन्माला आल्यापासून शिक्षणाशी आपली नाळ जुळलेली असते नव्हे तर आपण गर्भातच शिकत असतो.शिक्षण मग ते शाळेतील असो नाहीतर जीवनाच्या प्रवासातील अनुभवाचे शिक्षण

शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आणि आपण आजन्म विद्यार्थीच असतो.

शिक्षण हे दिल्लीचे शिक्षण मंत्री आदरणीय मनीष सिसोदिया यांनी लिहिलेलं आणि राहुल केशव कदम यांनी अनुवादित केलेलं पुस्तक हातात पडलं आणि शिक्षण ही एक किती व्यापक कल्पना असते याची प्रचिती आली आदरणीय मनीष सिसोदिया यांनी शिक्षणमंत्री म्हणून राबवलेले माझे अभिनव प्रयोग या पुस्तकात आपल्याला प्रत्येक पानावर  पाहायला मिळतात. शिक्षण हे पुस्तक पुण्याच्या मनोविकास प्रकाशन चे अरविंद घनश्‍याम पाटकर यांनी 22 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित केलेले आहे आदरणीय मनीष सिसोदिया साहेबांनी हे पुस्तक समर्पित करताना आपल्या सरकारी शाळेतील शिक्षकांना खूप मोठे स्थान दिलेले आहे ते म्हणतात या समर्पण पत्रिकेत


 *अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या सरकारी शाळांमधील सर्व शिक्षकांना समर्पित* 


म्हणजेच आमच्या सरकारी शाळेतील शिक्षक ही एक ध्येयवेडे काम करतात आणि एक शिक्षण मंत्री अशा शिक्षकांना आपलं पुस्तक समर्पित करतो ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे.

आपल्या मनोगतात ते म्हणतात राजकीय इच्छाशक्ती नियोजन आणि अविरत प्रयत्न असेल तर शिक्षण क्षेत्रात चमत्कार होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची शिक्षण पद्धती.

या पुस्तकात त्यांनी दोन भाग केले आहेत पहिल्या भागात शिक्षणाची पायाभरणी आणि दुसऱ्या भागात शिक्षण बनावं जीवनाचा पाया असे दोन भाग केले आहेत सुरुवातीला दिल्ली एक आशा या प्रकरणात त्यांनी ही संकल्पना राबवण्यात पूर्वी दिल्लीतील शिक्षण पद्धती कशी होती आणि सध्याची शिक्षण पद्धती कशी आहे याचे सखोल मार्गदर्शन केले आहे आणि थोडक्यात आढावा या ठिकाणी दिलेला आहे ते या ठिकाणी म्हणतात शिक्षकांच्या सहकार्याशिवाय त्यांना कार्यप्रवण बनवल्याशिवाय आणि त्यांना प्रेरित केल्याशिवाय शिक्षणक्षेत्रात कोणताही बदल करणे शक्य होणार नाही.

शिक्षणाची पायाभरणी या घटकात सुरुवातीला त्यांनी दिल्लीतील शाळांची इमारती त्यांचं रूप पालटण्यासाठी अंदाजपत्रक तयार केलं आणि ही एक महत्त्वपूर्ण  निर्णायक घटना या ठिकाणी घडलेली आहे आपले खर्च एक चतुर्थांश रक्कम शिक्षणासाठी राखून ठेवण्याचे धाडस करणारे हेच देशातील बहुदा पहिलेच सरकार होते.

पायाभूत सुविधांचा श्रीगणेशा या ठिकाणी घालण्यात आला आणि सर्वप्रथम वर्गखोल्या क्रीडांगणे प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाचे सद्यस्थितीची माहिती करून घेऊन त्यांचा विकास या ठिकाणी करण्यात आला. स्वतःचे घर बांधताना जसे आपण लक्ष घालतो तसे लक्ष लक्ष त्यांनी सरकारी शाळांच्या बांधकामात ते घालत होते आणि अर्थातच त्यांच्या मनातील भावना ही जवळपास तशीच होती सरकारी शाळांचा रूप त्यांनी बदलून टाकलं.

आव्हान परंपरेला छेद देण्याचं यामध्ये  मुलांसाठी मुलांचा विकास होण्यासाठी त्यांच्याशी क्षमतेनुसार वेगवेगळे गट तयार करण्यात आले आणि यामध्ये वाचन अक्षमता आणि मूलभूत गणित याचे आकलन कसे होईल यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावी यासाठी प्रतिभा ,निष्ठा, नवनिष्ठा असे गट तयार करण्यात आले. वाचनासाठी आणि गणितीय मूलभूत क्रियांसाठी उपक्रम राबवले .  वेगवेगळे अतिशय उच्च दर्जाचे उपक्रम त्यांनी राबवले. खरोखरच छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या स्वप्नांना गवसणी घालणे शक्य होते हे त्यांनी या विविध उपक्रमातून दाखवून दिले.

मुख्याध्यापक शाळेचा कप्तान यामध्ये ते म्हणतात विमानात पायलटची भूमिका असते तीच भूमिका आज शिक्षणक्षेत्रात प्रत्येक शिक्षक पार पाडत असतो .त्यामुळे जसा नेता तशी प्रजा .यासाठीच मुख्याध्यापकांच सक्षमीकरण करणं खूप गरजेचं वाटत होतं आणि यासाठी त्यांनी मुख्याध्यापकांना प्रशिक्षित करायचं ठरवलं.  त्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन सक्षम मुख्याध्यापक म्हणून तयार केलं .सगळ्यात महत्त्वाचं दिल्लीतील शाळेचे मुख्याध्यापक हे एक तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजे यूपीएससी त्या पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलेले आहेत किंवा त्यांना उपमुख्याध्यापक पदावरून पदोन्नती मिळाली आहे .एवढे सक्षम मुख्याध्यापक त्या ठिकाणी होते .आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण प्रशिक्षण त्यांनी मुख्याध्यापकांना देऊ केले या त्यांच्या प्रयत्नांमुळे काही सरकारी शाळांना सर्जनशील नेतृत्व मिळालं. त्यांनी पुढे जाऊन या उमलत्या कळ्यांना सुजाण आणि सुशिक्षित नागरिक बनवण्याचे व्रत हाती घेतले.

शिक्षक विश्वासाची पुनर्स्थापना यामध्ये त्यांनी प्रेरक शिक्षकांचा शोध घेतला.  ज्यांनी आपला जिद्द आणि उत्साह दाखवला त्यांना प्रेरक शिक्षक करून विशेष प्रशिक्षण देण्यात आले .या प्रेरक शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना विविध उपक्रमांची माहिती करून देणे हे काम केलं.प्रेरक शिक्षक आपलं अनुभव सांगताना म्हणतात प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे स्वतःला सिद्ध करावयाचे असते त्यांनी अशा अडचणींची पर्वा करून चालत नाही.

पालक एक महत्त्वपूर्ण घटक मुलांच्या शिक्षणाबाबत पालक आणि शिक्षक हे जणू दोन धुवा सारखे असतात त्यामुळे शिक्षकांबरोबरच पालकांचाही विकास करणं खूप गरजेचं आहे आणि ही गरज ओळखूनच शाळा व्यवस्थापन समित्या त्यांनी अधिकच सक्षमा बनवल्या.त्यांची निवडणूक लावली आणि लोकशाहीच्या तत्त्वावर शाळा व्यवस्थापन समित्या व त्यातली सदस्य यांची निवड होऊ लागली. शाळेतील पालकांचा सहभाग वाढवला. यासाठी त्यांनी मेघा पीटीएम पालक शिक्षक महामेळावा आयोजित केला.  महामेळाव्याचे विविध अनुभव त्यांनी विस्तृत  या ठिकाणी सादर केलेले आहेत.

या पुस्तकाचा दुसरा भाग म्हणजे शिक्षण बनावं जीवनाचा पाया.

यामध्ये जीवन विद्या शिबीर सहजीवनाची शैक्षणिक प्रारूप या संकल्पनेची रचना करण्यात आली यामध्ये वीस वर्षांच्या प्रवासानंतर मुलांकडून काय अपेक्षा आहेत त्यांना कोणत्या रुपात पाहणे आवडेल हे ध्येय निश्चित करणं आवश्यक होतं आणि या सर्वांचा विचार मान्य करून हे जीवन विद्या शिबीर आयोजित करण्यात आले.

आनंद वर्गाची भन्नाट कल्पना 

यांचा दिल्लीच्या सरकारी शाळेतील आनंद वर्ग दिल्लीतच नाही तर देशभरात प्रसिद्ध झाला आहे या शाळेतील एक विद्यार्थी दररोज एक तास नेमकं काय शिकतात हे या आनंद वर्गातून आपल्याला समजेल अशा प्रकारचे आनंद वर्ग मुलांची मानसिकता सकारात्मक आणि सर्जनशील करतात या आनंद वर्गाचे अनेक चांगले परिणाम दिसून आले आणि त्या अनुभवांची ही मांडणी याठिकाणी करण्यात आलेली आहे .या आनंद वर्गाची बीजे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकत्र चर्चेत राहून तयार केली आहेत .या आनंद वर्गाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे होता.

यामध्ये

1 सजग ध्यानधारणा

 2 विद्यार्थ्यांना अधिक जबाबदार आणि प्रगल्भ बनवण्यासाठी सांगितलेल्या प्रेरणादायी कथा

3 विद्यार्थी स्वतःचे विचार आणि प्रतिक्रिया वैज्ञानिक दृष्ट्या समजू शकतील असे उपक्रम

असा हा आनंद वर्ग दररोज आठ लाख विद्यार्थी घेत होते ही खचितच साधी बाब नव्हे यामधून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानप्राप्तीचा विचारदेखील सर्वांनाच रोमांचित करतो.

उज्वल भविष्याची नांदी या आपल्या शेवटच्या प्रकरणात ते म्हणतात की मी आजवर या केलेल्या सर्व नवनवीन उपक्रमांची उज्वल नांदी येत्या काही दिवसात सर्वांनाच पाहायला मिळेल .नुसती नोकरी करण्यासाठी शिक्षण नको तर इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास शिक्षण आपण घेतलं पाहिजे . या विचारातूनच त्यांनी नवउद्यमी मानसिकता अभ्यासक्रम अनेक तज्ञ आणि मान्यवरांच्या चर्चेतून तयार केला . वर्गाच्या चार भिंतीच्या बाहेरील या जगाची ओळख होण्याच्या दृष्टीने इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला . रोजगाराच्या वाटा या अभ्यासक्रमातून भावी पिढीसाठी निर्माण झाल्या. ही तर फक्त सुरुवात आहे अजून पुढच्या काही दिवसात याचं खरं स्वरूप या शिकलेल्या मुलांच्या तून आपल्याला दिसून येईल. या सार्‍या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना सहृदय पूर्वक मदत केली त्या सर्वांचे ऋणनिर्देश मानायला ते विसरले नाहीत .आपल्या शेवटच्या प्रकरणात ज्या अनेक छोट्या मोठ्या हाताने त्यांना मदत केली त्या सर्वांचे ऋणनिर्देश त्याठिकाणी मांडलेले आहेत. खरोखरच शिक्षण माणसाला प्रगल्भ आणि सुसंस्कारित करत असतं या त्यांच्या विविध उपक्रमांत बरोबरच त्यांना आपल्या सरकारी शाळेत देशभक्ती शिकवणारा अभ्यासक्रमही सुरू करावयाचा आहे आणि लवकरच ते आपल्या शाळांमधून हा अभ्यासक्रम सुरू करतील .दिल्लीच्या सरकारी शाळांमधून शिकणारे हे असंख्य विद्यार्थी उद्या भारताचे एक उत्तम आणि सुसंस्कारीत नागरिक झाल्या शिवाय राहणार नाहीत. प्रत्येक शिक्षक, पालक, विद्यार्थी, अधिकारी, पदाधिकारी यांनी या पुस्तकाचं वाचन करून आपल्या चिमुकल्या मुलांचे भवितव्य उज्वल कसं होईल याचा विचार करून विविध उपक्रम राबवले पाहिजेत. ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी उज्वल आणि उत्क्रांती करणारा घडतं तिथं आपण आपली सदिच्छा भेट देऊन काहीतरी आपल्या भविष्यासाठी अनुभवांची शिदोरी घेतली पाहिजे. तेव्हा नक्की हे पुस्तक वाचा. 

या पुस्तकात एकूण 148 पृष्ठ असून या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ अतिशय सुंदर आहे. सर्वसामान्य घरातील मुलं या मुखपृष्ठावर हसताना आणि एक नवी आशा निर्माण करताना दिसत आहेत .मनाला भावणारे आणि प्रफुल्लित करणारं असे हे मुखपृष्ठ शिक्षणक्षेत्रातील प्रत्येकालाच नवी उभारी देणार अस आहे.

अशी वेगवेगळी पुस्तकं वाचूया आणि आपला देश सुसंस्कारित घडवूया.

धन्यवाद🙏🏻🌹🌹✒️📚


 *सौ.अंजली शशिकांत गोडसे                             मर्ढे सातारा*

चैतन्यवेल 7

 १} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.📚✒️

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  7

४} पुस्तकाचे नाव      :-  चैतन्यवेल

५ } कवी           :-  मनोज अग्रवाल

६} प्रकाशक   :- साहित्य प्रसार केंद्र नागपूर

७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021  

८} एकूण पृष्ठ संख्या :-  86

९} वाड् मय प्रकार    :- कवितासंग्रह

१० } मूल्य     :- ₹ 120 फक्त


मनमंदिरात स्फूर्तीचा झरा अखंड पाझरत असेल तर आपल्या जीवनात आपल्या कार्याचा चैतन्यवेल सतत बहरत राहतो. असाच जीवनरूपी प्रवासात बहरणारा ,फुलणारा वेल,नव्या उमेदीची पालवी फुटलेला तुम्हा आम्हा सर्वांना आनंदित करणारा चैतन्य वेल आपल्या शब्दातून मनोज अग्रवाल यांनी अतिशय सुंदर रित्या शब्दबद्ध केला आहे. मुखपृष्ठाकडे पाहिलं की आपल्या मनात चैतन्याचे धुमारे फुटू लागतात आणि नकळत आपण त्यावर विराजमान होऊन एका वेगळ्याच सृष्टीत निघून जातो. चैतन्यवेल काव्यसंग्रह वाचताना माझीही अशीच अवस्था झाली होती.


वाहतील नवस्फूर्तीचे वारे तेजाळतील नवतेज तारे निवळूनी विकार सारे उन्नत मार्ग उमगेल धरूनी धीर थोडा चैतन्यवेल स्फुल्लिंगेल


आपल्या पहिल्याच चैतन्य वेल या कवितेतून अतिशय मनाला प्रेरणा देणारे या काव्यपंक्ती आहेत .कितीही निराशजनक परिस्थिती असली तरीही पुन्हा एकदा नवस्फूर्तीचे वारे फिरणार आहेत असा आशावाद कवी या ठिकाणी दाखवत आहे.


महती नितळ प्रेमाची असे असीम अमर्यादित द्वेषास जिंकावे प्रेमाने असू द्यावे प्रेम सदोदित


स्वच्छ आणि नितळ प्रेम कस असावं याची अनुभूती प्रेम सदोदित या आपल्या कवितेतून देताना कवी असं म्हणतोय कितीही राग आला तरी त्या रागाला प्रेमाने जिंकून घ्यावं घ् आणि आपले प्रेम हे सदोदित ठेवावं. कारण प्रेम हे कसं नातं हे किती कधीच विसरल जात नाही. राग क्षणाचा असतो पण प्रेम हे युगांतराचं असतं.


अडीच अक्षरे प्रेमाची 

व्यापती आसमंत सारे 

स्थानोस्थानी अस्तित्व प्रेमाचे न सुटले चंद्र-तारे


प्रेमाच्या या कचाट्यातून निसर्ग चंद्र तारे हि सूटले नाहीत आपण तर सर्वसामान्य माणसं. प्रेम फक्त प्रेयसीने प्रियकराचा नसून साऱ्या सजीव सृष्टी वर आपण करत असलेल्या प्रेमाची परिभाषा आपल्या शब्दातून याठिकाणी मनोज यांनी मांडलेली आहे.


असण्याने सुस्त वाढे अस्वस्थता 

आळशी मन वाढवी अस्थिरता

 देतात कष्ट मान-सन्मान 

होई कष्टकरी सुजन ,महान


आपल्या कष्ट या कवितेतून कष्टाचे मोल अतिशय सुंदर शब्दात रेखाटताना मनोज जी म्हणतात आळशी असलं की आपलं मन अस्थिर होतं आणि आपण सतत प्रयत्नात आणि कामात व्यस्त असलो की हे कामच आपल्याला मान सन्मान देत राहतं आणि जो कष्ट करतो तोच महान बनतो.


निनादेलं उजाळा कर्तुत्वाचा घेऊनी कार्यसिद्धी चा वसा सोबत ज्योती चिकाटीची प्रत्यक्ष स्मृतींचा अमीट ठसा


प्रयत्न ,चिकाटी, कष्ट, जिद्द याच गोष्टींना नेहमी यश चिकटलेले असतं. कर्तुत्व मोठ होण्यासाठी त्यामागं केलेल्या कष्टाची परिसीमा आठवावी लागते .कोणतंही यश सहजासहजी मिळत नाही .त्यासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजेत. आपल्या कवितेतून अतिशय सुंदर त्यांनी त्यांच्या स्मृतींचा  ठसा उमटवलेला आहे.


आपल्या शेवटच्या कवितेतून मृत्यूविषयी लिहताना ते म्हणतात मृत्यू एक अटळ सत्य आणि हा मृत्यू कधी ना कधीतरी आपल्यासमोर उभा राहणार आहे .त्यामुळे हे जीवन नश्वर आहे या ठिकाणी आपले जीवन सुंदररित्या जगून आपल्या शब्दांचा ठसा आपल्यामागे आपण सोडून गेलं पाहिजे.

जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूपच विशाल आहे त्यांच्या लेखणीस माझ्या हृदयस्थ शुभेच्छा🙏🏻✒️ अशीच तुमची लेखणी बहरत जावो.📚✒️


        शब्दांकन✒️

सौ .अंजली शशिकांत गोडसे

       मर्ढे सातारा.



हिरवी पाती 6

 १} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.📚✒️

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  6

४} पुस्तकाचे नाव      :-  हिरवी पती

५ } कवी  :- रवींद्रकुमार लटींगे

६} प्रकाशक  :- ग्राममित्र प्रकाशन कराड

७} प्रकाशन वर्ष  :- 2021 

८} एकूण पृष्ठ संख्या :-  72

९} वाड् मय प्रकार :- कवितासंग्रह

१० } मूल्य   :- ₹ 111 फक्त


वाऱ्यावर डुलणारी

उनाड हिरवी पाती 

निसर्ग मानवाचे 

सांगती अतूट नाती


.निसर्गाच्या छायेत आपण सतत रहात असतो.निसर्गाचे आणि आपले नाते अतूट आहे.निसर्गाच्या नाशाला सुरुवात झाली की, आपल्याही नाशाला सुरुवात होते. भिंतीवरचा रंग पुसला जातो. मनावर उमटलेला निसर्गाचा गर्द हिरवा रंग कधीच पुसला जात नाही. उलट वय वाढत जातं तसा तसा हा रंग अधिकच गडद होत जातो.


 अनेक शब्द आपल्या विस्मरणात जातात. पण हिरवा बोलीचा शब्द ओठावर आला की मनासमोर हिरवे गर्द रान दिसते. पाऊस पडत असताना आपण आपल्यालाच विसरत जातो. संध्याकाळी दिवेलागण मनाला हुरहुर लावून जाते. निसर्ग आपल्या तनामनात रुंजी घालत असतो. असाच सुंदर हिरवा निसर्ग आपल्या काव्यातून रवींद्रकुमार  यांनी रेखाटलेल्या आहे .


प्रत्येक पानापानावर जणूकाही ही झाडे शब्दांच्या रूपाने बोलकी होऊन आपल्याशी बोलत आहेत आणि एक अनोखा संवाद  आपल्याशी करत आहेत असा भास झाल्याशिवाय राहत नाही.


वार्‍याच्या स्पर्शाने मोहरायायचं 

पावसात सखे चिंब भिजायचं निसर्गाशी भ्रमंतीच नातं जपायचं 

जीवनात पाण्यावाणी प्रवाहित राहायचं


या पाझर तलाव आपल्या कवितेतून  सरांनी अतिशय सुंदर निसर्ग आणि जीवन यांचं नातं रेखाटलेले आहे. पावसात चिंब भिजायचं चिंब भिजताना सोबत मात्र सखी  आणि मग सखी सोबत आपलं जीवन या पाण्यासारख प्रवाहित करायचं .एवढा समर्पक अर्थ आपल्या काव्यपंक्तीतून या ठिकाणी त्यांनी रेखाटला आहे निसर्गप्रेमींना आकर्षित करना सातारा जिल्ह्यातील फुलांनी बहरलेला कास पुष्प पठार त्यांनी आपल्या काव्यातून रेखाटलेला आहे ते म्हणतात .


कातळ फुलोत्सवाची 

नजाकत भारी 

रूप दिसती 

देखणं पठारावरी 


असं देखणं रुप कास पठाराचे त्यांनी आपल्या काव्यातून रेखाटलेले आहे म्हणजे एका कवीला झाडात कविता दिसते, फुलात कविता दिसते, मातीत कविता दिसते कारण कविता ही त्याच्या सुरुवातीला हृदयात असते. असाच हा बहुताली बहरणारा निसर्ग सरांच्या हृदयातही बहरलेला आहे त्यामुळे त्यांनी बहरलेल्या फुलांचा कुंचला करून आपल्या निसर्ग लेखणीतून सारा नजारा शब्दबद्ध करून आम्हा रसिक आणि वाचक प्रेमींसाठी आपल्या पुस्तकरूपी ठेव्यातून बहाल केला आहे .

धुक्यात हरवली वाट 

ती शोधायला लागलो 

पुढं पुढं शोधता वाट 

मीच धुक्यात हरवलो 


आदरणीय सरांचं असं निसर्गात हरवून जाणं आपल्याला या काव्यसंग्रहात पानोपानी दिसतं आणि आपणही त्या शब्द धुक्यासंगे कधी हरवून जातो हे कळतच नाही .


  हिरवी पाती मधील कविता निसर्गाचे वेगवेगळे रूप आपल्याला दाखवतात. शांत वाहणारी नदी मात्र अतिवृष्टी मध्ये रौद्र रूप धारण करते आणि क्षणात सारं काही उद्ध्वस्त करते ही दोन्ही रूपं त्यांनी अतिशय समर्पक रीतीने आपल्या काव्यातून रेखाटली आहेत खरंतर ही त्यांच्या लेखणीची एक वैशिष्ट्यपूर्ण धाटणी आहे. त्यांच्या लेखणीला साक्षात निसर्गाचं वरदान लाभलेल आहे .अशीही हिरवीगार पाती सतत प्रफुल्लित आणि बहरत राहोत याच माझ्या शब्दफुलांच्या शुभेच्छा🌹🌷🌿🌴


शब्दांकन

सौ .अंजली शशिकांत गोडसे

            मर्ढे सातारा



Friday, April 1, 2022

माझे मातीतले पाय 5

 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य📚✒️


पुस्तक परिचय क्रमांक📗-5         *पुस्तकाचे नाव*

               *माझे मातीतले पाय*          

  *लेखक* 

 *प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर*                                                 

*परिचय कर्ता*- *सौ.अंजली शशिकांत गोडसे*

*मर्ढे सातारा*


प्रस्तावना


'माता' आणि 'माती' यांची बूज राखणाऱ्यांच्या अंगी 'प्रतिभा' ही प्रत्येक श्वासागणिक वाढणारी आणि बहरणारी असते. त्याचं 'प्रतिभे'च चित्र भावनारूपी शब्दांमधून व्यक्त होतं आणि त्यालाच कवितेचं देखणं रूप प्राप्त होतं. अशा अनेक काव्यरूपी शब्दमण्यांची एक भावनामय माळ तयार होते. त्या माळेचे आपण जेव्हा जेव्हा अंतःकरणापासून वाचन करतो त्यावेळेस आपल्या मनातील आंतरिक भावनेला साद घातली जाते. तेव्हाच त्यात प्रतिभा ओतप्रोत भरलेली असते. याप्रमाणेच 'माझे मातीतले पाय' या कवितासंग्रहातून कवी प्रा. अरूण कांबळे बनपुरीकर यांनी टिपलेल्या भावविश्वातल्या सुंदर कवितांची गुंफण केलेली आहे. 'ओढ' या कवितेमधून प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर व्यक्त होताना म्हणतात


'तुझ्या शहरीवासाच त्याचा नको रे सहवास


बरी माझी गां पांढरी


माझ्या मातीचा सुवास'


शहरापेक्षा आपलं गावं बरं! माझ्या गावच्या मातीचा येणारा सुवास हवाहवासा वाटतो प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांनी निसर्गातील विविध घटना आपल्या कवितेमधून दृश्य रूपात मांडल्या आहेत. कौटुंबिक नाते संबंधांवरचं त्यांचं काव्यही अतिशय सुंदर रेखाटलेले आहे. 'गावरान चव' या कवितेमधून व्यक्त होताना एका गरिबाच्या घरची ताजी भाजी कशी असते याचं सुंदर वर्णन करताना ते लिहतात -


"गरिबा घरची ताजी भाजी


तेलमिठाने मग जमून


जीभेवरच्या घासाला या


गावरान मग चव देते


शेती-भाती, आई-वडील, यांच्याविषयी लिहताना त्यांच्या मनातील भावनांचा बांध फुटतो आणि त्यातून त्यांची काव्यरूपी अश्रूफुले विविध छटांनी जन्म घेतात. वाचताना वाचकाच्या मनावर त्या भावनांचा आघात होतो. एवढं सामर्थ्य त्यांच्या

प्रतिभाशक्तीत सामावलेलं आहे.


'दुष्काळ' या कवितेमधून व्यक्त होतांना दुष्काळाच्या झळा एका शेतकऱ्याला किती दाहकरीत्या झोंबतात याच समर्पक वर्णन त्यांनी केलयं ते लिहतात.


"शेतात राबणारा बाप माझा


चारा छावणीत जातोय


गुरांना घालत चारा रोज


शिळ्या भाकऱ्या खातोय'


प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांच्या कविता एकाच विषयावर केंद्रित न होता त्यांच्या लेखणीने अनेक विषयांना अगदी अलगद स्पर्श करून वाचकांना एक काव्यमैफिलीची सुंदर मेजवानीच दिली आहे.


सारं जग भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहे. पण कवीला मात्र हीच भाकरी भासते ते आपल्या 'भाकरीचा सूर्य' या कवितेमधून व्यक्त होताना म्हणतात.


'भाकरीचा सूर्य गोल


रोज धावतो वेगात


आणि भूक पेटते


काळजांच्या ढगात'


या ओळी वाचताना खरचं पोटाला तिढा पडल्याशिवाय राहात नाही, पावसावरही त्यांनी आपलं काव्य अतिशय समर्पक केलेले आहे. आपल्या 'जीर्ण झालो असलो तरी या काव्यातून त्यांनी जगण्याची उर्मी दाखवली आहे ते लिहतात.


'जीर्ण झालो असलो तरी


फांद्याचे ओझे झेलतो आहे


हिरवळ पाहून अवतीभवती हिरवळीस या भूलतो आहे.


प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या सर्वच कविता अप्रतिम आहेत आणि या कवितेंना प्रतिभेची उंची लाभली आहे. कवितांच्या रूपाने त्यांचं हळवं मनं, मातीतल्या माणसांविषयीचे प्रेम, जीवनाकडे बघण्याची दृष्टी, समाजातील वास्तव त्यांच्या शब्दांमधून व्यक्त झालेलं दिसून येतं. सर्वच कविता अर्थपूर्ण असून रसिकप्रिय आहेत. स्वतः प्राध्यापक असूनही त्यांचे शब्द हे खोल गर्तेत न अडकता अगदी सहज-सोप्या भाषेत त्यांनी आपल्या कवितेचे आकर्षक पैलू निर्माण केले आहेत. 'माझ्या मातीतले पाय' या कवितासंग्रहाप्रमाणे त्यांच्या पायांनी मराठी साहित्याची वारी अखंडपणे चालू देत. त्यांचा कवितासंग्रह सर्व रसिकजनांच्या पसंतीस नक्कीच उतरेल. प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांची लेखणी उत्तरोत्तर बहरत जावो हीच शुभेच्छा !


 *माझे मातीतले पाय* 

 *समीक्षा प्रकाशन* 

 *पृष्ठसंख्या -९६* 

 *पुस्तकाची किंमत -१२० रुपये* 


✒️📚

सौ. अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)

मर्ढे

सातारा