Thursday, June 9, 2022

पसरणी गावची गौरव गाथा 9



 

१} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)

३} पुस्तक क्रमांक     :-  9

४} पुस्तकाचे नाव      :-  पसरणी गावची गौरव गाथा

५ } लेखक         :- श्री.शिवाजीराव शिर्के

६} प्रकाशक              :-प्रवीण प्रकाशन पुणे

७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021 प्रथमावृत्ती

८} एकूण पृष्ठ संख्या :-  104

९} मूल्य        150       :- ₹  फक्त


 *पसरणी गावची वाचता गौरव गाथा* 

 *तिच्या चरणी होतो माझा लीन माथा*


सह्याद्रीच्या कुशीत आणि कृष्णा नदीच्या मुशीत वसलेलं पसरणी हे माझं माहेर . नावाप्रमाणेच चौफेर पसरलेलं आणि वस्ती केलेलं पसरणी हे गाव . घरांची वस्ती चहुबाजूने पसरली तशीच पसरणी च्या नावाची कीर्तीही सार्‍या जगतात पसरलेली आहे . अजूनही मराठी लोकसंस्कृतीत जागरण आणि गोंधळ घालताना पसरणीच्या भैरीदेवाला आठवणीने जागराला बोलवलं जातं आणि या गीताचे सारे श्रेय पद्मश्री आदरणीय शाहीर साबळे यांना दिलं जातं .

हे झालं लोकसंस्कृती आणि शाहीरीचं तसेचं आधुनिक बांधकाम क्षेत्रात पद्मश्री बी .जी. शिर्के यांचं नावही मोठ्या गौरवाने आणि अभिमानाने घेतले जात . हे नाव उच्चारताच अंगावर रोमांच उभा राहतो तो म्हणजे  अभिमानाचा आणि शौर्याचा, कर्तुत्वाचा, कीर्तीचा.

 *मा* मातृत्वाचं आणि पितृत्वाचं लेणं

जिथल्या कुशीत मिळतं ते ठिकाणं

 *हे* हेवा वाटतो प्रत्येकिला आपल्या बालपणीच्या आठवणींचा

 *र* रमतं जिथं मन आणि मिळतो चार दिसांचा विसावा असं हळवं घर


 पसरणी गावची गौरव गाथा हे पुस्तक आदरणीय शिवाजीराव शिर्के यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे तसं बघायला गेलं तर  गावचा सारा इतिहास आणि गौरव ग्रंथ याला म्हणावे लागेल. अजूनही या पुस्तकात दिवसेंदिवस अनेक हिरे मानके जोडली जातील. असाच गौरवशाली इतिहास या गावाचा आहे .सुरुवातीलाच या पुस्तकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील यांचे शुभेच्छा संदेश लाभले आहेत. हा गौरव ग्रंथ लिहिण्यासाठी पसरणी गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांनी मदत केली त्यांनाही मानाचा मुजरा याठिकाणी करण्यात आलेला आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर  गावचे आराध्य दैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा सुंदर फोटो तसेच श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीची प्रतिमा याठिकाणी छापलेली आहे .गावातील साजरे होणारे उत्सव यांच्या प्रतिमाही पुस्तकात  दिलेल्या आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखकांचा संक्षिप्त परिचय देण्यात आलेला आहे .हे पुस्तक प्रवीण प्रकाशन शिवसुमन फुगेवाडी पुणे या ठिकाणाहून प्रकाशित करण्यात आलेले आहे. या पुस्तकामध्ये एकूण 27 प्रकरण केलेली आहेत आणि त्यामध्ये  गावातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, ठिकाण, महात्म्य, इतिहास यांचा इतिवृत्तांत देण्यात आलेला आहे.

पसरणी गावाचा नकाशा सुरुवातीला त्या पुस्तकात देण्यात आलेला आहे यामुळे पसरणी गावाचे पर्यटन करताना कोणती स्थळ कोणत्या ठिकाणी आहेत हे आपल्याला समजून येते. या गौरव ग्रंथाला प्रस्तावना आदरणीय जगन्नाथ बाबुराव मुळीक सर यांनी आपल्या खास शैलीत दिलेली आहे. तसेच सुप्रसिद्ध लेखक व निवेदक आदरणीय  श्रीकांत चौगुले यांनी या पुस्तकासाठी आपला अभिप्राय लिहिलेला आहे.

सातारा जिल्ह्यात, वाई तालुक्यात असलेलं पसरणी हे माझं गाव, सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेलं गाव. ऐतिहासिक इतिहासाने गाजलेलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, छत्रपती शाहु महाराजांनी, नबाब, रघुनाथ स्वामीला वास्तव्याला दिलेलं, आणि कृष्णा नदीचा परिसर लाभलेलं, सृष्टी सौंदर्याने बहरलेलं माई पसरणी गाव मला फार, फार मनापासून आवडते.

प्राचीनकाळी विराटनगरी, दक्षिण भारताची काशी अशी वाई प्रसिध्दीस आलेले शहर  छ. शाहु महाराजांचे मातब्बर सरदार भिकाजीराव रास्ते यांनी • कृष्णातीरावर अनेक मंदिर बांधून पवित्र केलेले शहर. वाई शहराच्या पश्चिमेस ५ किलोमीटर अंतरावर पसरून वस्ती केलेलं पसरणी हे गाव. गावाला व गावच्या वैभवाला इतिहास आहे. गावामधील बहुसंख्य शेतकरी शेतात घरे बांधून वस्ती करून राहिलेले आहेत. गावांत रघुनाथ स्वामींनी बांधलेला रामाचा मठ आहे. गावाशेजारीच काही अंतरावर नबाबाचा बंगला आहे. या बंगल्यातून तो ४२ गावांचा कारभार पाहत होता. आता तो धोम धरणग्रस्तांनी विकत घेऊन त्यात ते राहत आहेत.


पसरणी गावाजवळच असणाऱ्या सोनगिरी व गाव डोंगराच्या घाटातून महाबळेश्वर, पांचगणीला जाणारा रस्ता आहे. वाई शहराची हद्द संपली की, पसरणी घाटाला सुरूवात होते. सुरूवातीलाच पसरणी घाट, वेडी वाकडी वळणे, “वाहने सावकाश हाका!" असा बोर्ड वाचावयास मिळतो. घाट पार करीत असतांना मध्यंतरी बुवासाहेबाचे मंदिर लागते. देवास नमस्कार करून रुपया, आठ आणे

टाकून प्रवासी पुढे प्रवासाला निघून जातात. या बुवासाहेब देवाबद्दल एक आख्यायिका सांगण्यात येते. एक इंग्रज आपल्या घोड्याच्या बग्गीमधून पैसे, दागिने, अनेक मौल्यवान वस्तू घेऊन महाबळेश्वरला चालला होता. त्याने या देवास लाथ मारली आणि पुढे प्रवास करू लागला. घाटातील मोठ्या मोरीजवळ येताच आकाशांत अचानक पावसाचे ढग जमा होऊन जोराचा पाऊस झाला व त्यात तो वाहून गेला. त्याच्या अनेक वस्तू अजूनही सापडतात, असे जुने, जाणकार लोकांकडून सांगितले जाते.


पुढे गेल्यावर डोंगराच्या माथ्यावर सपाट मैदान लागते. यास “थापा” असे नाव आहे. या थाप्यावरून वाई शहर आणि कृष्णानदीचे पात्र, पांडवगड, तसेच धोम धरणाचा सुंदर जलाशय, चमकणाऱ्या मोत्याप्रमाणे दिसतो. पसरणी गावातील घरे काड्यापेट्या विस्कटून टाकल्या प्रमाणे दिसतात. ऊसाची शेती निळसर, लाल तुऱ्यांनी खुलून दिसते. हिरवी, पिवळी भात खाचरे, हिरवेगार डोंगरातून शेतातून जाणाऱ्या पाऊलवाटा दिसतात. "महाराष्ट्राचे काश्मीर" 'म्हणून ओळखला जाणारा महाबळेश्वरचा भाग लाभलेल्या निसर्ग सौंदर्यामुळेच हा परिसर प्रत्येकाच्या मनाला खिळवून ठेवतो.


पसरणी गावाशेजारील गाव डोंगरामध्ये मी लहानपणी शाळेत असतांना शेळ्या, गुरे, बैले चारावयास घेऊन जात होतो. त्यावेळी प्राथमिक शाळा ही माझ्या घराशेजारीच गोपाळराव पानसे यांच्या वाड्यामध्ये भरत होती. नंतर ती मारुती मंदिराशेजारी भरू लागली. कालांतराने गाव ओढ्याजवळच गावकऱ्यांनी मोठी वास्तू बांधली. त्यांत १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंत शाळा भरते. हनुमान मंदिरा पाठीमागे बारवेची विहिरीच्या ठिकाणी काळभैरवनाथ प्रगटले अशी आख्यायिका आहे.

एवढं सुंदर वर्णन आदरणीय शिवाजीराव शिर्के यांनी आपल्या गावाबद्दल केले आहे .याच पुस्तकात माझे आजोबा शिर्के भाऊ आणि पणजोबा यांचीही शौर्यगाथा लिहिली आहे.


१)पसरणी गावची पूर्वपीठिका


२)गावची मंदिरे-इतिहासाच्या पाऊलखुणा


३)काळभैरवनाथाचे माहात्म्य ४)निसर्ग सौंदर्य लाभलेले पसरणी गाव


५)माझे गाव पसरणी-बी.जी. शिर्के 


६)शोध आदर्श व्यक्तिमत्त्वांचा (गावची व्यक्तिमत्त्वे) 


७) क्षेत्र पसरणी काळभैरवनाथ माहात्म्य

८) पंच्याहत्तर वर्षापूर्वीचे पसरणी गाव


९) पसरणी गावचा सांस्कृतिक इतिहास १०) पसरणी गावची भैरवनाथ यात्रा


११) पसरणी गावचे उज्वल भविष्य


१२) हिंदू-खाटीक यांचे भैरवनाथ श्रध्दास्थान


१३) माझ्या आठवणीतील पसरणी गाव


१४) पसरणी गावची कहाणी


१५)श्री क्षेत्रपाल भैरवाचे वैभव


१६) पसरणी ग्रामपंचायत माहिती


१७) गावातील पतसंस्था, ट्रस्ट, संस्था


१८) विकास सेवा सोसायटी- गावच्या विकासाची गंगोत्री १९) पसरणी गावची माहिती - काव्यात


२०) महाराष्ट्र राज्य माहिती


२१) गावची आदरणीय प्रभावी व्यक्तीमत्त्वे


२२)एक सत्यशोधकी कार्यकर्ता-वरखडे गुरूजी 

२३) प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व- प्रदीपकुमार महांगडे


२४) पसरणी गावची ठळक वैशिष्टे


(२५) गावचा अभिमान-अभिनेत्री अश्विनी महांगडे


२६) पसरणी गावच्या यात्रेचं महत्व


२७)भैरवनाथ विद्यालय पसरणी जन्मकथा

एवढी विस्तृत माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे ही सारी माहिती संकलित करण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे या सर्वांचे शेवटी विशेष आभार मानण्यात आलेले आहेत यामध्ये गावातील सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे खरोखरच अभी अभिमान वाटावा अस माझं माहेर आणि असं हे पुस्तक साहित्य नगरी प्रसिद्ध होईल आणि गौरव गाथा दस देशातून सदोदित निनादत राहील सर्वांनी वाचावे समजून घ्यावं असे हे पुस्तक मी वाचलेले पुस्तक आणि थोडक्यात त्याचे परीक्षण याठिकाणी केले माझ्या परीक्षणापेक्षाही खूप मोठं गाव आणि त्यातील माणसं . या सर्वांना  पुन्हा एकदा माझा हृदय पुर्वक मानाचा मुजरा.

🌹 *माहेर माझं पसरणी*🌹


माझ्या माहेराची वाट

झाडी हिरवीगार दाट

आठवते मला नित्यरोज

माहेराची रम्य पहाट


   पाखरांची होते किलबिल

   मंदिरात ढोलताशांचा नाद

   घरोघरी प्रज्वलीत चूल

   मंजूळ वारा घालतो साद

 

माझ्या माहेराला आहे

कृष्णाबाईचा भव्य काठ

साऱ्या जगतात आहे

माझ्या माहेराची मान ताठ


   चौफेर पसरली आहे

   माझ्या माहेराची अमृत वाणी

   त्यावरूनच नाव गावाचे

   निसर्गरम्य माझी पसरणी

 

माझ्या माहेराला आहे

मोठा ऐतिहासिक वारसा

दिमाखात उभा आहे

नबाबाच्या बंगल्याचा आरसा


   उद्योगपती शाहीरांनी

  पसरवली माहेराची किर्ती

  दोन पद्मश्री असलेले

  पहिल गाव माझं सत्कारमूर्ती


पांचगणी महाबळेश्वरला जाणारा

भव्य दिव्य पसरणी घाट

माझ्या माहेराचा दाखवतो

सुखसमृद्धिचा थाट


  साऱ्या पंचक्रोशीत भरतो

  माहेराचा मोठा दसरा

  नाथसाहेबांच्या भक्तीरसात

  आनंदून जातो गावसारा


माझ्या गावची यात्रा

जपे साहित्य संस्कृतीचा वारसा

नव्या युगातील घडतो तिथे

मायावी नगरीचा जलसा


   परक्या मुलुखात राबतो

   माहेराचा माझ्या कष्टकरी हात

   वाट पाहतो त्यांची

  जन्मदायी माता आणि तात


लक्ष ठेव साऱ्या गावावर

जागृत देवा माझ्या भैरोबा

सुखासमाधानाने नांदू दे

घराघरातील घरोबा


   पून्हा पून्हा जन्मा यावे

   पसरणीआईच्या काळया कुशीत

    जीवन आपले सार्थ करावे

   जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात


✍🏻 *अंजली गोडसे( शिर्के)*✍🏻

       *मर्ढे ( सातारा)*


शिक्षण 8



 

१} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  8

४} पुस्तकाचे नाव      :-  #शिक्षण #मनीष #सिसोदिया

५ } अनुवाद          :-  राहुल केशव कदम

६} प्रकाशक              :- मनोविकास प्रकाशन पुणे

७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021 

८} एकूण पृष्ठ संख्या :-  148

९} मूल्य        170  ₹  फक्त


माणूस जन्माला आल्यापासून शिक्षणाशी आपली नाळ जुळलेली असते नव्हे तर आपण गर्भातच शिकत असतो.शिक्षण मग ते शाळेतील असो नाहीतर जीवनाच्या प्रवासातील अनुभवाचे शिक्षण

शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आणि आपण आजन्म विद्यार्थीच असतो.

शिक्षण हे दिल्लीचे शिक्षण मंत्री आदरणीय मनीष सिसोदिया यांनी लिहिलेलं आणि राहुल केशव कदम यांनी अनुवादित केलेलं पुस्तक हातात पडलं आणि शिक्षण ही एक किती व्यापक कल्पना असते याची प्रचिती आली आदरणीय मनीष सिसोदिया यांनी शिक्षणमंत्री म्हणून राबवलेले माझे अभिनव प्रयोग या पुस्तकात आपल्याला प्रत्येक पानावर  पाहायला मिळतात. शिक्षण हे पुस्तक पुण्याच्या मनोविकास प्रकाशन चे अरविंद घनश्‍याम पाटकर यांनी 22 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित केलेले आहे आदरणीय मनीष सिसोदिया साहेबांनी हे पुस्तक समर्पित करताना आपल्या सरकारी शाळेतील शिक्षकांना खूप मोठे स्थान दिलेले आहे ते म्हणतात या समर्पण पत्रिकेत


 *अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या सरकारी शाळांमधील सर्व शिक्षकांना समर्पित* 


म्हणजेच आमच्या सरकारी शाळेतील शिक्षक ही एक ध्येयवेडे काम करतात आणि एक शिक्षण मंत्री अशा शिक्षकांना आपलं पुस्तक समर्पित करतो ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे.

आपल्या मनोगतात ते म्हणतात राजकीय इच्छाशक्ती नियोजन आणि अविरत प्रयत्न असेल तर शिक्षण क्षेत्रात चमत्कार होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची शिक्षण पद्धती.

या पुस्तकात त्यांनी दोन भाग केले आहेत पहिल्या भागात शिक्षणाची पायाभरणी आणि दुसऱ्या भागात शिक्षण बनावं जीवनाचा पाया असे दोन भाग केले आहेत सुरुवातीला दिल्ली एक आशा या प्रकरणात त्यांनी ही संकल्पना राबवण्यात पूर्वी दिल्लीतील शिक्षण पद्धती कशी होती आणि सध्याची शिक्षण पद्धती कशी आहे याचे सखोल मार्गदर्शन केले आहे आणि थोडक्यात आढावा या ठिकाणी दिलेला आहे ते या ठिकाणी म्हणतात शिक्षकांच्या सहकार्याशिवाय त्यांना कार्यप्रवण बनवल्याशिवाय आणि त्यांना प्रेरित केल्याशिवाय शिक्षणक्षेत्रात कोणताही बदल करणे शक्य होणार नाही.

शिक्षणाची पायाभरणी या घटकात सुरुवातीला त्यांनी दिल्लीतील शाळांची इमारती त्यांचं रूप पालटण्यासाठी अंदाजपत्रक तयार केलं आणि ही एक महत्त्वपूर्ण  निर्णायक घटना या ठिकाणी घडलेली आहे आपले खर्च एक चतुर्थांश रक्कम शिक्षणासाठी राखून ठेवण्याचे धाडस करणारे हेच देशातील बहुदा पहिलेच सरकार होते.

पायाभूत सुविधांचा श्रीगणेशा या ठिकाणी घालण्यात आला आणि सर्वप्रथम वर्गखोल्या क्रीडांगणे प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाचे सद्यस्थितीची माहिती करून घेऊन त्यांचा विकास या ठिकाणी करण्यात आला. स्वतःचे घर बांधताना जसे आपण लक्ष घालतो तसे लक्ष लक्ष त्यांनी सरकारी शाळांच्या बांधकामात ते घालत होते आणि अर्थातच त्यांच्या मनातील भावना ही जवळपास तशीच होती सरकारी शाळांचा रूप त्यांनी बदलून टाकलं.

आव्हान परंपरेला छेद देण्याचं यामध्ये  मुलांसाठी मुलांचा विकास होण्यासाठी त्यांच्याशी क्षमतेनुसार वेगवेगळे गट तयार करण्यात आले आणि यामध्ये वाचन अक्षमता आणि मूलभूत गणित याचे आकलन कसे होईल यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावी यासाठी प्रतिभा ,निष्ठा, नवनिष्ठा असे गट तयार करण्यात आले. वाचनासाठी आणि गणितीय मूलभूत क्रियांसाठी उपक्रम राबवले .  वेगवेगळे अतिशय उच्च दर्जाचे उपक्रम त्यांनी राबवले. खरोखरच छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या स्वप्नांना गवसणी घालणे शक्य होते हे त्यांनी या विविध उपक्रमातून दाखवून दिले.

मुख्याध्यापक शाळेचा कप्तान यामध्ये ते म्हणतात विमानात पायलटची भूमिका असते तीच भूमिका आज शिक्षणक्षेत्रात प्रत्येक शिक्षक पार पाडत असतो .त्यामुळे जसा नेता तशी प्रजा .यासाठीच मुख्याध्यापकांच सक्षमीकरण करणं खूप गरजेचं वाटत होतं आणि यासाठी त्यांनी मुख्याध्यापकांना प्रशिक्षित करायचं ठरवलं.  त्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन सक्षम मुख्याध्यापक म्हणून तयार केलं .सगळ्यात महत्त्वाचं दिल्लीतील शाळेचे मुख्याध्यापक हे एक तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजे यूपीएससी त्या पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलेले आहेत किंवा त्यांना उपमुख्याध्यापक पदावरून पदोन्नती मिळाली आहे .एवढे सक्षम मुख्याध्यापक त्या ठिकाणी होते .आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण प्रशिक्षण त्यांनी मुख्याध्यापकांना देऊ केले या त्यांच्या प्रयत्नांमुळे काही सरकारी शाळांना सर्जनशील नेतृत्व मिळालं. त्यांनी पुढे जाऊन या उमलत्या कळ्यांना सुजाण आणि सुशिक्षित नागरिक बनवण्याचे व्रत हाती घेतले.

शिक्षक विश्वासाची पुनर्स्थापना यामध्ये त्यांनी प्रेरक शिक्षकांचा शोध घेतला.  ज्यांनी आपला जिद्द आणि उत्साह दाखवला त्यांना प्रेरक शिक्षक करून विशेष प्रशिक्षण देण्यात आले .या प्रेरक शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना विविध उपक्रमांची माहिती करून देणे हे काम केलं.प्रेरक शिक्षक आपलं अनुभव सांगताना म्हणतात प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे स्वतःला सिद्ध करावयाचे असते त्यांनी अशा अडचणींची पर्वा करून चालत नाही.

पालक एक महत्त्वपूर्ण घटक मुलांच्या शिक्षणाबाबत पालक आणि शिक्षक हे जणू दोन धुवा सारखे असतात त्यामुळे शिक्षकांबरोबरच पालकांचाही विकास करणं खूप गरजेचं आहे आणि ही गरज ओळखूनच शाळा व्यवस्थापन समित्या त्यांनी अधिकच सक्षमा बनवल्या.त्यांची निवडणूक लावली आणि लोकशाहीच्या तत्त्वावर शाळा व्यवस्थापन समित्या व त्यातली सदस्य यांची निवड होऊ लागली. शाळेतील पालकांचा सहभाग वाढवला. यासाठी त्यांनी मेघा पीटीएम पालक शिक्षक महामेळावा आयोजित केला.  महामेळाव्याचे विविध अनुभव त्यांनी विस्तृत  या ठिकाणी सादर केलेले आहेत.

या पुस्तकाचा दुसरा भाग म्हणजे शिक्षण बनावं जीवनाचा पाया.

यामध्ये जीवन विद्या शिबीर सहजीवनाची शैक्षणिक प्रारूप या संकल्पनेची रचना करण्यात आली यामध्ये वीस वर्षांच्या प्रवासानंतर मुलांकडून काय अपेक्षा आहेत त्यांना कोणत्या रुपात पाहणे आवडेल हे ध्येय निश्चित करणं आवश्यक होतं आणि या सर्वांचा विचार मान्य करून हे जीवन विद्या शिबीर आयोजित करण्यात आले.

आनंद वर्गाची भन्नाट कल्पना 

यांचा दिल्लीच्या सरकारी शाळेतील आनंद वर्ग दिल्लीतच नाही तर देशभरात प्रसिद्ध झाला आहे या शाळेतील एक विद्यार्थी दररोज एक तास नेमकं काय शिकतात हे या आनंद वर्गातून आपल्याला समजेल अशा प्रकारचे आनंद वर्ग मुलांची मानसिकता सकारात्मक आणि सर्जनशील करतात या आनंद वर्गाचे अनेक चांगले परिणाम दिसून आले आणि त्या अनुभवांची ही मांडणी याठिकाणी करण्यात आलेली आहे .या आनंद वर्गाची बीजे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकत्र चर्चेत राहून तयार केली आहेत .या आनंद वर्गाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे होता.

यामध्ये

1 सजग ध्यानधारणा

 2 विद्यार्थ्यांना अधिक जबाबदार आणि प्रगल्भ बनवण्यासाठी सांगितलेल्या प्रेरणादायी कथा

3 विद्यार्थी स्वतःचे विचार आणि प्रतिक्रिया वैज्ञानिक दृष्ट्या समजू शकतील असे उपक्रम

असा हा आनंद वर्ग दररोज आठ लाख विद्यार्थी घेत होते ही खचितच साधी बाब नव्हे यामधून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानप्राप्तीचा विचारदेखील सर्वांनाच रोमांचित करतो.

उज्वल भविष्याची नांदी या आपल्या शेवटच्या प्रकरणात ते म्हणतात की मी आजवर या केलेल्या सर्व नवनवीन उपक्रमांची उज्वल नांदी येत्या काही दिवसात सर्वांनाच पाहायला मिळेल .नुसती नोकरी करण्यासाठी शिक्षण नको तर इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास शिक्षण आपण घेतलं पाहिजे . या विचारातूनच त्यांनी नवउद्यमी मानसिकता अभ्यासक्रम अनेक तज्ञ आणि मान्यवरांच्या चर्चेतून तयार केला . वर्गाच्या चार भिंतीच्या बाहेरील या जगाची ओळख होण्याच्या दृष्टीने इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला . रोजगाराच्या वाटा या अभ्यासक्रमातून भावी पिढीसाठी निर्माण झाल्या. ही तर फक्त सुरुवात आहे अजून पुढच्या काही दिवसात याचं खरं स्वरूप या शिकलेल्या मुलांच्या तून आपल्याला दिसून येईल. या सार्‍या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना सहृदय पूर्वक मदत केली त्या सर्वांचे ऋणनिर्देश मानायला ते विसरले नाहीत .आपल्या शेवटच्या प्रकरणात ज्या अनेक छोट्या मोठ्या हाताने त्यांना मदत केली त्या सर्वांचे ऋणनिर्देश त्याठिकाणी मांडलेले आहेत. खरोखरच शिक्षण माणसाला प्रगल्भ आणि सुसंस्कारित करत असतं या त्यांच्या विविध उपक्रमांत बरोबरच त्यांना आपल्या सरकारी शाळेत देशभक्ती शिकवणारा अभ्यासक्रमही सुरू करावयाचा आहे आणि लवकरच ते आपल्या शाळांमधून हा अभ्यासक्रम सुरू करतील .दिल्लीच्या सरकारी शाळांमधून शिकणारे हे असंख्य विद्यार्थी उद्या भारताचे एक उत्तम आणि सुसंस्कारीत नागरिक झाल्या शिवाय राहणार नाहीत. प्रत्येक शिक्षक, पालक, विद्यार्थी, अधिकारी, पदाधिकारी यांनी या पुस्तकाचं वाचन करून आपल्या चिमुकल्या मुलांचे भवितव्य उज्वल कसं होईल याचा विचार करून विविध उपक्रम राबवले पाहिजेत. ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी उज्वल आणि उत्क्रांती करणारा घडतं तिथं आपण आपली सदिच्छा भेट देऊन काहीतरी आपल्या भविष्यासाठी अनुभवांची शिदोरी घेतली पाहिजे. तेव्हा नक्की हे पुस्तक वाचा. 

या पुस्तकात एकूण 148 पृष्ठ असून या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ अतिशय सुंदर आहे. सर्वसामान्य घरातील मुलं या मुखपृष्ठावर हसताना आणि एक नवी आशा निर्माण करताना दिसत आहेत .मनाला भावणारे आणि प्रफुल्लित करणारं असे हे मुखपृष्ठ शिक्षणक्षेत्रातील प्रत्येकालाच नवी उभारी देणार अस आहे.

अशी वेगवेगळी पुस्तकं वाचूया आणि आपला देश सुसंस्कारित घडवूया.

धन्यवाद🙏🏻🌹🌹✒️📚


 *सौ.अंजली शशिकांत गोडसे                             मर्ढे सातारा*

चैतन्यवेल 7

 १} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.📚✒️

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  7

४} पुस्तकाचे नाव      :-  चैतन्यवेल

५ } कवी           :-  मनोज अग्रवाल

६} प्रकाशक   :- साहित्य प्रसार केंद्र नागपूर

७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021  

८} एकूण पृष्ठ संख्या :-  86

९} वाड् मय प्रकार    :- कवितासंग्रह

१० } मूल्य     :- ₹ 120 फक्त


मनमंदिरात स्फूर्तीचा झरा अखंड पाझरत असेल तर आपल्या जीवनात आपल्या कार्याचा चैतन्यवेल सतत बहरत राहतो. असाच जीवनरूपी प्रवासात बहरणारा ,फुलणारा वेल,नव्या उमेदीची पालवी फुटलेला तुम्हा आम्हा सर्वांना आनंदित करणारा चैतन्य वेल आपल्या शब्दातून मनोज अग्रवाल यांनी अतिशय सुंदर रित्या शब्दबद्ध केला आहे. मुखपृष्ठाकडे पाहिलं की आपल्या मनात चैतन्याचे धुमारे फुटू लागतात आणि नकळत आपण त्यावर विराजमान होऊन एका वेगळ्याच सृष्टीत निघून जातो. चैतन्यवेल काव्यसंग्रह वाचताना माझीही अशीच अवस्था झाली होती.


वाहतील नवस्फूर्तीचे वारे तेजाळतील नवतेज तारे निवळूनी विकार सारे उन्नत मार्ग उमगेल धरूनी धीर थोडा चैतन्यवेल स्फुल्लिंगेल


आपल्या पहिल्याच चैतन्य वेल या कवितेतून अतिशय मनाला प्रेरणा देणारे या काव्यपंक्ती आहेत .कितीही निराशजनक परिस्थिती असली तरीही पुन्हा एकदा नवस्फूर्तीचे वारे फिरणार आहेत असा आशावाद कवी या ठिकाणी दाखवत आहे.


महती नितळ प्रेमाची असे असीम अमर्यादित द्वेषास जिंकावे प्रेमाने असू द्यावे प्रेम सदोदित


स्वच्छ आणि नितळ प्रेम कस असावं याची अनुभूती प्रेम सदोदित या आपल्या कवितेतून देताना कवी असं म्हणतोय कितीही राग आला तरी त्या रागाला प्रेमाने जिंकून घ्यावं घ् आणि आपले प्रेम हे सदोदित ठेवावं. कारण प्रेम हे कसं नातं हे किती कधीच विसरल जात नाही. राग क्षणाचा असतो पण प्रेम हे युगांतराचं असतं.


अडीच अक्षरे प्रेमाची 

व्यापती आसमंत सारे 

स्थानोस्थानी अस्तित्व प्रेमाचे न सुटले चंद्र-तारे


प्रेमाच्या या कचाट्यातून निसर्ग चंद्र तारे हि सूटले नाहीत आपण तर सर्वसामान्य माणसं. प्रेम फक्त प्रेयसीने प्रियकराचा नसून साऱ्या सजीव सृष्टी वर आपण करत असलेल्या प्रेमाची परिभाषा आपल्या शब्दातून याठिकाणी मनोज यांनी मांडलेली आहे.


असण्याने सुस्त वाढे अस्वस्थता 

आळशी मन वाढवी अस्थिरता

 देतात कष्ट मान-सन्मान 

होई कष्टकरी सुजन ,महान


आपल्या कष्ट या कवितेतून कष्टाचे मोल अतिशय सुंदर शब्दात रेखाटताना मनोज जी म्हणतात आळशी असलं की आपलं मन अस्थिर होतं आणि आपण सतत प्रयत्नात आणि कामात व्यस्त असलो की हे कामच आपल्याला मान सन्मान देत राहतं आणि जो कष्ट करतो तोच महान बनतो.


निनादेलं उजाळा कर्तुत्वाचा घेऊनी कार्यसिद्धी चा वसा सोबत ज्योती चिकाटीची प्रत्यक्ष स्मृतींचा अमीट ठसा


प्रयत्न ,चिकाटी, कष्ट, जिद्द याच गोष्टींना नेहमी यश चिकटलेले असतं. कर्तुत्व मोठ होण्यासाठी त्यामागं केलेल्या कष्टाची परिसीमा आठवावी लागते .कोणतंही यश सहजासहजी मिळत नाही .त्यासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजेत. आपल्या कवितेतून अतिशय सुंदर त्यांनी त्यांच्या स्मृतींचा  ठसा उमटवलेला आहे.


आपल्या शेवटच्या कवितेतून मृत्यूविषयी लिहताना ते म्हणतात मृत्यू एक अटळ सत्य आणि हा मृत्यू कधी ना कधीतरी आपल्यासमोर उभा राहणार आहे .त्यामुळे हे जीवन नश्वर आहे या ठिकाणी आपले जीवन सुंदररित्या जगून आपल्या शब्दांचा ठसा आपल्यामागे आपण सोडून गेलं पाहिजे.

जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूपच विशाल आहे त्यांच्या लेखणीस माझ्या हृदयस्थ शुभेच्छा🙏🏻✒️ अशीच तुमची लेखणी बहरत जावो.📚✒️


        शब्दांकन✒️

सौ .अंजली शशिकांत गोडसे

       मर्ढे सातारा.



हिरवी पाती 6

 १} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.📚✒️

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  6

४} पुस्तकाचे नाव      :-  हिरवी पती

५ } कवी  :- रवींद्रकुमार लटींगे

६} प्रकाशक  :- ग्राममित्र प्रकाशन कराड

७} प्रकाशन वर्ष  :- 2021 

८} एकूण पृष्ठ संख्या :-  72

९} वाड् मय प्रकार :- कवितासंग्रह

१० } मूल्य   :- ₹ 111 फक्त


वाऱ्यावर डुलणारी

उनाड हिरवी पाती 

निसर्ग मानवाचे 

सांगती अतूट नाती


.निसर्गाच्या छायेत आपण सतत रहात असतो.निसर्गाचे आणि आपले नाते अतूट आहे.निसर्गाच्या नाशाला सुरुवात झाली की, आपल्याही नाशाला सुरुवात होते. भिंतीवरचा रंग पुसला जातो. मनावर उमटलेला निसर्गाचा गर्द हिरवा रंग कधीच पुसला जात नाही. उलट वय वाढत जातं तसा तसा हा रंग अधिकच गडद होत जातो.


 अनेक शब्द आपल्या विस्मरणात जातात. पण हिरवा बोलीचा शब्द ओठावर आला की मनासमोर हिरवे गर्द रान दिसते. पाऊस पडत असताना आपण आपल्यालाच विसरत जातो. संध्याकाळी दिवेलागण मनाला हुरहुर लावून जाते. निसर्ग आपल्या तनामनात रुंजी घालत असतो. असाच सुंदर हिरवा निसर्ग आपल्या काव्यातून रवींद्रकुमार  यांनी रेखाटलेल्या आहे .


प्रत्येक पानापानावर जणूकाही ही झाडे शब्दांच्या रूपाने बोलकी होऊन आपल्याशी बोलत आहेत आणि एक अनोखा संवाद  आपल्याशी करत आहेत असा भास झाल्याशिवाय राहत नाही.


वार्‍याच्या स्पर्शाने मोहरायायचं 

पावसात सखे चिंब भिजायचं निसर्गाशी भ्रमंतीच नातं जपायचं 

जीवनात पाण्यावाणी प्रवाहित राहायचं


या पाझर तलाव आपल्या कवितेतून  सरांनी अतिशय सुंदर निसर्ग आणि जीवन यांचं नातं रेखाटलेले आहे. पावसात चिंब भिजायचं चिंब भिजताना सोबत मात्र सखी  आणि मग सखी सोबत आपलं जीवन या पाण्यासारख प्रवाहित करायचं .एवढा समर्पक अर्थ आपल्या काव्यपंक्तीतून या ठिकाणी त्यांनी रेखाटला आहे निसर्गप्रेमींना आकर्षित करना सातारा जिल्ह्यातील फुलांनी बहरलेला कास पुष्प पठार त्यांनी आपल्या काव्यातून रेखाटलेला आहे ते म्हणतात .


कातळ फुलोत्सवाची 

नजाकत भारी 

रूप दिसती 

देखणं पठारावरी 


असं देखणं रुप कास पठाराचे त्यांनी आपल्या काव्यातून रेखाटलेले आहे म्हणजे एका कवीला झाडात कविता दिसते, फुलात कविता दिसते, मातीत कविता दिसते कारण कविता ही त्याच्या सुरुवातीला हृदयात असते. असाच हा बहुताली बहरणारा निसर्ग सरांच्या हृदयातही बहरलेला आहे त्यामुळे त्यांनी बहरलेल्या फुलांचा कुंचला करून आपल्या निसर्ग लेखणीतून सारा नजारा शब्दबद्ध करून आम्हा रसिक आणि वाचक प्रेमींसाठी आपल्या पुस्तकरूपी ठेव्यातून बहाल केला आहे .

धुक्यात हरवली वाट 

ती शोधायला लागलो 

पुढं पुढं शोधता वाट 

मीच धुक्यात हरवलो 


आदरणीय सरांचं असं निसर्गात हरवून जाणं आपल्याला या काव्यसंग्रहात पानोपानी दिसतं आणि आपणही त्या शब्द धुक्यासंगे कधी हरवून जातो हे कळतच नाही .


  हिरवी पाती मधील कविता निसर्गाचे वेगवेगळे रूप आपल्याला दाखवतात. शांत वाहणारी नदी मात्र अतिवृष्टी मध्ये रौद्र रूप धारण करते आणि क्षणात सारं काही उद्ध्वस्त करते ही दोन्ही रूपं त्यांनी अतिशय समर्पक रीतीने आपल्या काव्यातून रेखाटली आहेत खरंतर ही त्यांच्या लेखणीची एक वैशिष्ट्यपूर्ण धाटणी आहे. त्यांच्या लेखणीला साक्षात निसर्गाचं वरदान लाभलेल आहे .अशीही हिरवीगार पाती सतत प्रफुल्लित आणि बहरत राहोत याच माझ्या शब्दफुलांच्या शुभेच्छा🌹🌷🌿🌴


शब्दांकन

सौ .अंजली शशिकांत गोडसे

            मर्ढे सातारा